राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिलाच सभा नाशिकमधील येवल्यात पार पडली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. वय झालं हे खरं आहे, 82 झालं आहे हे खरं आहे. पण गडी काय आहे, हे पाहिलाय कुठे? अजून तर पत्ताच नाही. असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना कडक इशारा दिला. तर छगन भुजबळ यांना येवल्यातून निवडून दिलं, त्याबद्दल जाहीर सभेत त्यांनी माफी मागितली. राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे नाशिकमध्ये पोहोचले. छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी जोरदार भाषण करून कार्यकर्त्यांची मनं जिंकली.






काही जण म्हणाले, तुमचं वय झालं, तुम्ही निवृत्त व्हा, वय झालं हे खरं आहे, 82 झालं आहे हे खरं आहे. पण गडी काय आहे, हे पाहिलाय कुठे? अजून तर पत्ताच नाही.जास्त काही सांगायची गरज नाही. उगाच वयाच्या भानगडीत पडू नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, पुन्हा असा विचार करू नका. धोरणात्मक टीका करा, कार्यक्रमावर टीका करा, पण वय,व्यक्तिगत भावना आम्हाला कुणी शिकवलेली नाही. यशवंत चव्हाणांच्या विचारांचे लोक आहोत आम्ही. व्यक्तिगत हल्ले कधी झाले नाही. आमची तक्रार नाही कधी, ज्या जनतेनं निवडून दिलं, ज्या जनतेच्या विश्वासाला तडा दिला ती गोष्ट सहन करणार नाही. आज ना उद्या तुम्हाला याची किंमत चुकवावी लागणार आहे. या ठिकाणी खात्रीने सांगतो, असं म्हणत पवारांनी अजितदादांना चांगलंच खडसावलं.
पवारांचं मोदींना आव्हान
मध्यंतरी 10 ते 12 दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं. त्यांनी भाषणात सांगितलं की, काँग्रेस पक्षावर हल्ला केला. त्यांच्यावर आरोप केले. हे करत असताना राष्ट्रवादीवर टीका केली. एक दोन उदाहरणं सांगितली. जे त्यांनी आरोप केले. ते आरोप भ्रष्टाचाराचे असतील, राज्याच्या गोष्ट मांडल्या असतील, माझं पंतप्रधान मोदींना सांगणं आहे, जर आमच्या पैकी कुणी भ्रष्टाचारामध्ये सहभागी असेल तर असेल नसेल ती सत्ता वापरा. भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा, सखोल प्रकरणात जा, आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेला असेल पाहिजे ती सजा द्या, आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा असेल, असं म्हणत पवारांनी थेट मोदींना आव्हान दिलं.
भुजबळांबद्दल मागितली माफी
दुष्काळी भागातला आपला शेतकरी असेल, सहकारी असेल त्यांनी कधी साथ सोडली नाही. त्यामुळे असा विचार केला, दिल्ली मुंबईमध्ये काही लोकांनी आम्ही जनतेच्या समोर सादर केलं, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणायचे असेल तर भक्कम विश्वास दाखवायचा असेल तर येवल्याची निवड केली.
काही जणांनी सांगितलं, पवारांनी नाव दिलं आम्ही निवडून दिलं, एकदा दोनदा आणि तीन वेळा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही, पण एका नावाने घोटाळा केला, त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा होता. त्यासाठी आम्ही इथं आलोय, कुणाचं कौतुक करण्यासाठी इथं आलो नाही, मी यासाठी माफी मागण्यासाठी आलोय, माझा अंदाज कधी चुकूत नाही, इथं माझा अंदाज चुकला. माझ्या विचारांवर तुम्ही निकाल दिले, त्यावर तुम्हालाही यातना झाल्या. तुम्हाला माझ्या निर्णयामुळे वेदना झाल्या असतील तर माझं कर्तव्य झालं आहे, मी माफी मागितली पाहिजे. कधी कधी लोकांच्या समोर येण्याची वेळ येईल. आज येईल, उद्या येईल, वर्षभराने येईल, पण पुन्हा चूक करणार नाही. योग्य निकालाचा निकाल सांगेन, असंही पवार म्हणाले.













