मुंबई दि. २५ (रामदास धो. गमरे) “तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भिख्खू संघाने काही गाथा निर्माण केल्या असून त्या त्रिपिटिकात कुठेही आढळत नाही कारण काही गाथा बुद्धांच्या वाणीतून आलेल्या गाथा आहेत, जयमंगलअष्टगाथा यात आठ घटकांचं विशेष महत्व असून माणसाच्या मनात ज्या विषारी भावना निर्माण होतात त्या बुद्धांनी धम्म आणि पारीमिता याने जिंकले त्या बुद्धाच्या विचाराने तुमचे मंगल होवो. अनवत यक्षत (राक्षस) याने बुद्धाला हरवण्याची पैज लावली व त्याने बुद्धाला काही प्रश्न विचारले बुद्ध शांत राहिले व सर्वात श्रेष्ठ धन म्हणजे श्रद्धा, सर्वात श्रेष्ठ आचरण म्हणजे धम्म आचरण होय. गौतम बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त याने बुद्धांना मारण्यासाठी अनेक कटकारस्थान रचले, अनेक प्रयत्न केले एकवेळ त्याने नालागिरी नावाचा उन्मत्त हत्ती बुद्धांच्या दिशेने सोडला बुद्ध मात्र शांतपणे त्याच्यासमोर उभे राहिले त्यांच्या मुखातून मैत्रीपूर्ण आवाजात नालागिरी असा उच्चार होताच उन्मत्त नालागिरी हत्ती शांत झाला व तो बुद्धाला शरण गेला अशा बुद्धांच्या विचाराने आपले मंगल होवो. अहिंसक नावाचा एक अत्यंत बुद्धिमान आणि कुशल विद्यार्थी होता; परंतु चुकीच्या मार्गदर्शनामुळे आणि परिस्थितीमुळे तो हिंसक दरोडेखोर बनला त्याने अनेकांची हत्या करून त्यांच्या बोटांची माळ बनवली होती. एके दिवशी तो बुद्धांच्या मागे धावला; पण बुद्ध शांतपणे चालत असूनही त्याला पकडता आले नाही शेवटी अंगुलीमाल ओरडला ‘थांबा!’ बुद्ध म्हणाले, ‘अंगुलीमाल, मी थांबलो आहे; तू थांब.’ अंगुलीमालला बुद्धांचा आशय कळाला की ‘मी हिंसा सोडली आहे; तू अजूनही हिंसेच्या मार्गावर चालत आहेस.’ हे शब्द अंगुलीमालाच्या अंतःकरणाला भिडले त्याने शस्त्र त्यागले, बुद्धांच्या शरण गेला आणि पुढे भिक्षू बनून धम्ममार्गावर चालू लागला अशा बुद्धांच्या विचाराने आपले मंगल होवो, म्हणून जयमंगलअष्टगाथा ही तथागत गौतम बुद्धांची गौरव गाथा आहे” असे प्रतिपादन वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प गुंफत असताना अरुण सोनोजी कांबळे यांनी जयमंगलअष्टगाथा या विषयावर बोलत असताना केले.







बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे या प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे पार पडले सदर प्रसंगी गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्योती तांबे यांनी आपल्या सुमधुर वाणीने सूत्तपठण व पूजापठण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करीत असताना “ज्यांना श्रामनेर शिबिरात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावनोंदणी करावी, तसेच बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या धम्म सहलीत जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी सहभागी व्हावे” असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात बोलत असताना विनोद मोरे यांनी “अरुण कांबळे गुरुजींनी जयमंगलअष्टगाथा या विषयावर बोलत असताना सर्वांना सहज समजेल अशा साध्या भाषेत पाली भाषेतील गाथा अनेक उदाहरणे देत समजावून सांगितल्या त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे, त्यांच्या आजच्या प्रवचनातून त्यांच्या ज्ञानाची प्रचिती येते आहे आणि हे ज्ञान त्यांची वाचन, मनन, पठण आणि अनुभव यातून मिळविले म्हणून प्रत्येक बौद्धाचार्यांनी वाचन, मनन, चिंतन करणे आवश्यक आहे अनुभव घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपण ही इतरांस मार्गदर्शन करताना प्रभावीपणे आपली मत मांडू शकता” असे नमूद केले.
सदर कार्यक्रमास कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, चिटणीस रविंद्र शिंदे, तुकाराम घाडगे, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, माजी शिक्षण कमिटीचे तुळशीराम शिर्के, महिला मंडळाच्या सायली साळवी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून मनोहर बा. मोरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.












