पुण्यातील मांजरी परिसरात विविध १४ मागण्यांसाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी १५ विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत तब्बल पाच तास चर्चा केली.चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.







दोन दिवसांची मुदत; विद्यार्थी भूमिकेवर ठाम
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी काही तांत्रिक बाबींचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री अशोक उईके यांनी दोन दिवसांची मुदत मागितली. तसेच विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. मात्र, केवळ आश्वासनावर विश्वास न ठेवता मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन थांबवू, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, सलग १४ दिवस उपोषण सुरू असल्याने काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.
झिरवळांचा विद्यार्थ्यांना ‘खाऊन-पिऊन आंदोलन’चा सल्ला
शिष्टमंडळासोबतची चर्चा झाल्यानंतर अशोक उईके आणि नरहरी झिरवळ आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी नरहरी झिरवळ यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’, असा सल्ला दिला. आपला आंदोलनाचा अनुभव सांगताना त्यांनी आपण आंदोलन करताना चोरून खायचो, असेही नमूद केले.
झिरवळांच्या या वक्तव्यावर विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘खाऊन-पिऊन आंदोलन करायचे असते तर तुम्ही येथे आलेच नसते,’ असे विद्यार्थ्यांनी झिरवळांना सुनावले. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी या वक्तव्याची चर्चा सुरू झाली. झिरवळ यांनी केलेला हा सल्ला आंदोलनाची थट्टा करणारा असल्याची भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ‘झिरवळांना मजाक करण्याची सवय आहे,’ असेही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
मंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अडथळा नाही
अशोक उईके यांनी चर्चेनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका मांडली. ‘आदिवासी विभागाचा मंत्री आणि एक पालक म्हणून मी विद्यार्थ्यांशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली आहे. आमची पोरं-पोरी आपल्या हक्कासाठी बोलू लागली आहेत, याचा मला अभिमान आहे,’ असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कोणताही अडथळा नसल्याचे सांगत काही तांत्रिक बाबींवर विचार करून निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, या चर्चेनंतरही उपोषण मागे घेण्यास विद्यार्थी तयार नसून त्यांच्या १४ मागण्यांवर ठोस निर्णय आणि त्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.













