विखेपाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

0

महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विखे पाटील यांच्याकडे ओबीसीचे प्रमाणपत्र असल्याचा आरोप होत आहे, असा प्रश्न काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. यावर फक्त विखे पाटीलच नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचे प्रमाणपत्र आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ओबीसीचे प्रमाणपत्र काढून ठेवले आहे, असं खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. शरद पवारांकडे देखील ओबीसी प्रमाणपत्र आहे का, हे मला माहित नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना केलं.

विजय वडेट्टीवारांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

विजय वडेट्टीवारांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता, हे सर्व ऐकून मला धक्का बसला. माझ्याकडे माझं जन्म प्रमाणपत्र आहे. डिग्रीचं प्रमाणपत्र आहे. त्यानंतर माझ्या लग्नाचं प्रमाणपत्र आणि बारामतीच्या खासदार म्हणून माझ्याकडे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे रोज उठून काँग्रेस अशा प्रकारचे आरोप का करतंय?, याबाबत मला आर्श्चय वाटतंय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. तसेच माझ्याकडे कोणतंच ओबीसीचं प्रमाणपत्र नाही, हे मी नक्की सांगते, असं सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या. काँग्रेस पक्षाकडून मला दररोज टार्गेट का केलं जातंय, याबाबत मी महाराष्ट्र काँग्रेसलाच विचारावं लागेल, हे दुर्देवी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अधिक वाचा  महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुणे-साताऱ्यासह ‘या’ जिल्ह्यांना आज येलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटलांकडून आंदोलनाचा इशारा

दुसरीकडे, कुणबी नोंदी सापडून प्रमाणपत्र मिळत नसल्याने आणि मिळालेली प्रमाणपत्रे जात वैधता समितीकडून अवैध घोषित करण्यात आल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा केली आहे. 29 ऑगस्टपासून उपोषणाला बसण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. गरज पडल्यास पुन्हा एकदा आपला मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिल आहे. दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील आंदोलनांसाठी राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. मराठे मुंबईत जाणार आहेत, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केलं, यात झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.

अधिक वाचा  पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा संपन्न सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व! – डाॅ. श्रीपाल सबनीस

जे आपले म्हणून बसवले तेच मुंबईत येऊ नका म्हणतात

सरकार विरोधात जात आहे, लोकांनी यांना सत्तेवर बसवले, मराठ्यांनी यांना सत्तेवर बसवले. मात्र, त्याच गोरगरीब मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखणं म्हणजे विरोध वाढण्याचे कारण फक्त सरकार आहे. कायदा तुमच्या हातात आम्ही देतो, सत्ता आम्ही तुमच्या हातात देतो आणि तुम्ही त्याचा गैरवापर करता. लोक यासाठी तुम्हाला निवडून देतात की, आपण कसल्याही परिस्थितीत मुंबईला जरी गेलो, तरी आपलं सरकार तिथे आहे. आपले फडवणीस, आपले शिंदे तिथे बसले आहेत. जे आपले म्हणून बसवले तेच मुंबईत येऊ नका म्हणतात, ही खूप मोठी दहशत झाली. ही सरकारची दादागिरी झाली, ही चालत नसते असेही जरांगे पाटील यांनी म्हटले..

अधिक वाचा  शाळेच्या पाहणीसाठी जाताच अभिजीत दिपके यांच्या सहकाऱ्यांना मारहाण; गावकऱ्यांचा हल्ला काचाही फोडल्या