राज्यासह देशात दुष्काळाचा धोका वाढला; देशभरात पावसाची १३% तूट पावसाचं चित्र सप्टेंबरमध्ये कसं? स्कायमेटचा अंदाज

0

जून-जुलैमधील पावसाची तूट ऑगस्टमध्ये भरून काढण्यात मान्सूनला अपेक्षित यश न आल्याने यंदाच्या संपूर्ण मान्सून हंगामात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ८५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ‘स्कायमेट’ने अद्ययावत अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे दुष्काळाचा धोका वाढला असून, संपूर्ण हंगामात दुष्काळाची शक्यता ७० टक्के असल्याचे ‘स्कायमेट’ने नमूद केले.

भारतीय हवामान विभागाने जुलैअखेरीस जारी केलेल्या अंदाजानुसार देशभरात ९४ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडेल असे म्हटले होते. ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार, ऑगस्टमध्ये देशभरात सुमारे २१४ मिमी पाऊस पडण्याची शक्यता असून, हा पाऊस पावसाच्या दीर्घकालीन सरासरीच्या ८४ टक्के असेल. ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता ७० टक्के आहे. सप्टेंबरमध्येही स्थिती फारशी बदलण्याची शक्यता नसून, सुमारे १३४ मिलीमीटर म्हणजे दीर्घकालीन सरासरीच्या ८० टक्के पावसाचा अंदाज आहे. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ७० टक्के आहे.

अधिक वाचा  दोन अनाथ विद्यार्थिनींना कोंडलं, Whatsapp Status अन्… रात्रभर पुण्यात राडा; काँग्रेस-भाजपामध्ये नेमकं घडलं काय? A To Z माहिती

यंदाच्या मान्सूनवर वाढता ‘एल निनो’ परिणाम करू शकते, याकडे सातत्याने लक्ष वेधले जात होते. मात्र, काही भागांमध्ये विविध प्रणालींमुळे सरासरी किंवा अधिक पाऊस पडल्याने ‘एल निनो’च्या परिणामाचा व्यापक अंदाज स्थानिकांना येत नसल्याचेही दिसले. विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र आणि वातावरणातील परिणामांची साखळी अधिक मजबूत होत असून, सप्टेंबरच्या सुरुवातीला ‘एल निनो’ अधिक सशक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धातील पावसावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

देशात १ जून ते १८ ऑगस्ट या कालावधीत सरासरी ५२७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. देशभरात पावसाची एकूण तूट १३ टक्के आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात २६ टक्के, वायव्य भारतात ११ टक्के, पावसाच्या मुख्य क्षेत्रात म्हणजे मध्य भारतात एक टक्का, तर दक्षिण भारतात २२ टक्के तूट आहे. ईशान्येकडील बहुतांश राज्यामध्ये पावसाची तूट आहे. लडाखमध्ये मात्र सरासरीच्या २०३ टक्के पाऊस पडला आहे. देशात लडाख आणि ओडिशा येथे अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे किंवा पावसाची तूट आहे. देशभरातील ७४१ जिल्ह्यांपैकी ४४ टक्के जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. तर ३७ टक्के जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे.

अधिक वाचा  कॅबिनेट मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड समोर, सोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर कोणी केला? मोदी कितव्या क्रमांकावर?