संसदेमध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी, विद्यार्थी आंदोलन, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज यासह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तराची मागणी करत आहे. तर दुसरीकडे आता एनडीएचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी राहुल गांधी चर्चेपासून दूर पळत असल्याचा आरोप केला. आज एनडीच्या खासदारांनी संसदेत राहुल गांधी यांच्याविरोधात मोर्चा काढला. राहुल गांधी यांनी सभागृहात यावे. त्यांनी चर्चेपासून पळू नये अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.







संसद परिसरात एनडीए खासदारांचे आंदोलन सुरू आहे. झारखंडमधील लाठीचार्जवरून सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी उत्तर देण्याची मागणी सत्ताधारी करत आहेत. रांचीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की, गृहमंत्री अमित शहा सभागृहात सविस्तर उत्तरे देण्यास तयार असूनही राहुल गांधी चर्चेपासून दूर पळत आहेत.
भाजप नेत्यांनी तर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘राहुल भागना नहीं’ अशी हॅशटॅग मोहीमही सुरू केली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, जंतर-मंतरवर गोळ्या चालल्या नाहीत. राहुल गांधी या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी राहुल गांधी यांना चलेंज केले की, ‘संसदेमध्ये या. चर्चेपासून पळू नका. काँग्रेस चर्चेची मागणी करत आहे आणि जेव्हा सरकारची उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा विरोधी पक्ष सभागृहातून बाहेर पडत आहे.’
भाजप नेते जेपी नड्डा यांनी काँग्रेसच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, ‘राहुल गांधींना जंतर मंतरचा मुद्दा संसदेत चर्चेचा विषय बनवायचा आहे, पण जेव्हा सरकार चर्चेसाठी तयार असते, तेव्हा राहुल गांधी मागे हटत आहेत. सरकार उत्तर देण्यास तयार असते तेव्हा विरोधी पक्ष सभागृहातून बाहेर पडत आहे.’ तसंच, ‘गृहमंत्री प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहेत. यात काही नवीन नाही. सरकारने यापूर्वीही संसदेत विविध मुद्द्यांवर प्रतिसाद दिला आहे. याचा रेकॉर्ड संसदीय कामकाजात उपलब्ध आहे.’, असा दावा त्यांनी केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्ट केली त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘लोकशाही प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देते, त्याचबरोबर उत्तरे ऐकण्याची जबाबदारीही टाकते. गृहमंत्री अमित शाह विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यांवर सभागृहात सविस्तरपणे आपली मते मांडण्यास पूर्णपणे तयार आहेत. काँग्रेस आणि संपूर्ण विरोधी पक्षांनी वस्तुस्थिती स्वीकारावी. सभागृहाची प्रतिष्ठा जपावी आणि उत्तरे पूर्णपणे ऐकावीत अशी अपेक्षा आहे. लोकशाहीत चर्चेतून प्रतिष्ठा वाढते, पळून जाण्याने नाही.’, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.













