आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. आपल्या भविष्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.







समविचारी पक्षांनी पाठिंबा द्यावा- प्रकाश आंबेडकर
सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा द्यावा असे आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
प्रकाश आंबेडकर यांनी जंतर मंतरवर जाऊन घेतली होती अभिजीत दिपके यांची भेट
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, यासाठी आम्ही तुमच्यासोबत असू, अशी ग्वाही प्रकाश आंबेडकर यांनी अभिजीत दिपके यांना दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर राहुल गांधी यांचे धरणे आंदोलन
लोकसभेत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याची चर्चा व्हावी, यासाठी राहुल गांधी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. मात्र सरकारच्या परवानगीनंतर आपण चर्चा करू, असे बिर्ला यांनी सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा मार्ग राहुल गांधी यांनी निवडला. त्यानुसार दुपारी चार वाजता राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांच्या घराबाहेर धडकले. त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, ज्येष्ठ नेते जयराम नरेश आदी नेते राहुल गांधी यांच्यासोबत होते. गेल्या तासाभरापासून राहुल गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरले आहे. त्यानंतर सरकारकडून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी धाडले आहे.













