दिल्लीत सुरू असलेल्या NEET पेपरफुटी आंदोलनावरून शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ भूमिका घेत आंदोलनावर टीका केली. आंदोलनाला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप करत त्यांनी काही शक्ती देशात दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करत असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांसह काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार टीका केली आहे.







दिल्लीत सुरू असलेल्या NEET पेपरफुटी आंदोलनावर बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य असल्याचे सांगितले. “NEET पेपरफुटी प्रकरणाशी धर्मेंद्र प्रधान यांचा थेट संबंध नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नाही,” असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले. “केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जाणीवपूर्वक वातावरण तयार केले जात आहे. काही सोशल मीडिया गट आणि राजकीय पक्ष आंदोलनाला चिथावणी देत आहेत. देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा दावा खोत यांनी केला.
तसेच “केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र आहेत. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने अजिबात घेऊ नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
खोत यांच्या वक्तव्यावर आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. “सरकारविरोधात बोलणाऱ्यांना दहशतवादी ठरवण्याची भाषा सुरू आहे. आम्ही ग्रामीण भागातील, देशभरातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी आहोत. आम्हाला दहशतवादी म्हणणे हा तरुणांचा अपमान आहे,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “NEET पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त झाले असून २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अशा वेळी न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी.”
पुढे ते म्हणाले, “केवळ भाजपाच्या कृपेने मिळालेल्या आमदारकीमुळे सदाभाऊ खोत भाजपाचे बटीक झाले आहेत. त्यांनी देशातील तरुणाईचा अवमान केला आहे. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना तुम्ही दहशतवादी होता का? भाजपची पापे लपवण्यासाठी तरुणांना दहशतवादी ठरविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यानंतर NEET आंदोलनावरून राजकीय वातावरण अधिक तापले असून, त्यांच्या विधानावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.













