NEET-UG 2026 परीक्षेतील कथित गैरव्यवहारांवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)च्या खासदारांना महत्त्वाचा संदेश दिला. मुलांना भडकवू नका, त्यांना योग्य मार्ग दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.







दिल्लीतील संसद ग्रंथालय भवनातील जी. एम. सी. बालयोगी सभागृहात झालेल्या NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. दिल्लीत NEET-UG 2026 परीक्षेतील गैरव्यवहारांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या मोठ्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे वक्तव्य केले.
‘चुकीच्या मार्गावर जाणे सोपे, परत येणे कठीण’
बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, चुकीच्या मार्गावर जाणे सोपे असते, पण योग्य मार्गावर परत येणे अधिक कठीण असते. त्यामुळे त्यांना योग्य मार्गावर आणणे ही आपली जबाबदारी आहे. यावेळी त्यांनी युवकांची दिशाभूल होत असल्याची चिंता व्यक्त केली. युवकांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना भडकवू नका, योग्य मार्ग दाखवा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
जे. पी. नड्डा आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बैठक
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याच्या एक दिवस आधी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे प्रतिनिधी सौरव दास आणि आशुतोष रंका यांनी सोमवारी नड्डा यांची भेट घेत तीन प्रमुख मागण्या मांडल्या.
CJP च्या तीन प्रमुख मागण्या
- NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी.
- केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
- सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करावी.
सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जूनच्या उत्तरार्धात या आंदोलनात सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतील कथित गैरव्यवहारांबाबत सरकारने जबाबदारी स्वीकारावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, या मागण्यांसाठी ते आमरण उपोषण करत आहेत.
‘सरकारने दोषींवर कारवाई केली’
NDA बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी बैठकीत NEET-UG पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. पेपरफुटीची माहिती समोर आल्यानंतर सरकारने तातडीने कारवाई केली आणि या गैरव्यवहारासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आली, असे पंतप्रधानांनी बैठकीत सांगितल्याचे ते म्हणाले.
विरोधकांना संसद सुरळीत चालवण्याचे आवाहन
राजकीय मतभेद असू शकतात, हे मान्य करत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांनाही संसद सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
रिजिजू म्हणाले, आम्ही विरोधकांना विनंती करतो की मतभेद असू शकतात, पण देशाच्या हितासाठी संसद सुरळीत चालली पाहिजे.
NEET-UG 2026 वाद नेमका काय?
NEET-UG 2026 परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती. मात्र परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि पेपरफुटीचे आरोप झाल्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू झाले. त्यानंतर अनेक अटकसत्रे झाली आणि वाढत्या दबावामुळे सरकारने मूळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 21 जून रोजी देशभरात NEET-UG ची पुनर्परीक्षा घेण्यात आली.
बैठक चांगली झाली
CJP प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, बैठक नेहमीप्रमाणेच चांगली झाली, एवढेच सांगितले.
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार नड्डा यांनी CJP च्या प्रतिनिधींना आंदोलन थांबवून प्रशासनाला राजधानीतील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या तीनही मागण्यांबाबत कोणतेही आश्वासन किंवा ठोस हमी देण्यात आलेली नाही.













