राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बिहारमधील बांकीपूर या विधानसभा मतदारसंघावर राजकीय रणनितीकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी विजय मिळवला.विजयाच्या तिसऱ्याच दिवशी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.







राज्यसभा खासदार पार्थ पवार चार्टर विमानाने प्रशांत किशोर यांना मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या भेटीला घेऊन आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल, असा सल्ला किशोर यांनी सुनेत्रा पवारांना दिला असल्याचं समजतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी तब्बल सहा तास बैठक पार पडली. या बैठकीत याविषयी चर्चा झाली.
नेमका प्रशांत किशोर यांनी काय सल्ला दिला?
“भविष्यातील निवडणुकांसाठी आपण काम करण अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल. जोपर्यंत राज्यातील नेतृत्व आमच्यासोबत काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला राज्यात काम करणे कठीण आहे.” असं सल्ला प्रशांत किशोर यांनी बैठकीत दिला.
तसेच त्यांनी यापूर्वी सल्ले देऊनही राष्ट्रवादीने बदल न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीच्या ३ बैठकांमधे याबाबत सांगून देखील बदल होतं नसतील तर काम करणे कठीण असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. या बैठकीला पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यासोबतच प्रशांत किशोर यांच्या टीममधील दोन महत्त्वाचे सदस्यही उपस्थित होते.आता प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यावर सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जर तस झालं तर सध्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले सुनील तटकरे यांची उलचबांगडी होऊ शकते. त्यामुळे त्यांचं पद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीत मोठे बदल होतील अशी शक्यता आहे. सध्याच्या घडीला तरी राष्ट्रवादी काँग्रेस ‘वेट अॅन्ड वॉच’ अशाच भूमिकेत आहे.













