भारतातल्या लहान मुलांना या आजारांचा धोका, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्सचं वाढतं प्रमाण चिंताजनक, ICMR नं दिला गंभीर इशारा

0

घरात लहान मूल असेल तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे. मूल वारंवार पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करत असेल, तर एका अहवालानं पालकांची चिंता वाढवली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (ICMR) अंतर्गत असलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’नं एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे.या अहवालानुसार, जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक्स किंवा ज्यूस हे भारतातील मुलांच्या आरोग्याचे सर्वात मोठे शत्रू बनले आहेत. यातली आकडेवारी पाहिली की आपल्याला याचा अंदाज येईल.

अहवालानुसार, देशातील पाच ते एकोणीस वयोगटातील सुमारे चार कोटी दहा लाख मुलं अतिरिक्त वजन किंवा लठ्ठ आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, जवळपास दहा टक्के मुलं ‘प्री-डायबेटिस’नं ग्रस्त आहेत, एक टक्का किशोरवयीन मुलांना मधुमेह झाला आहे आणि पाच टक्के मुलं उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करत आहेत. थोडक्यात, देशात दर तीन मुलांपैकी एका मुलाला कोणत्या ना कोणत्या आजाराचा त्रास होत आहे.

अधिक वाचा  मुंबई-ठाण्यात ED चे छापे 1 कोटी जप्त केंद्रीय अधिकारी असल्याचा भास 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीचा पर्दाफाश

वैज्ञानिक भाषेत जंक फूडला HFSS म्हणजेच High Fat, Sugar, and Salt असं संबोधलं जातं. म्हणजेच असे खाद्यपदार्थ ज्यात चरबी म्हणजेच फॅट, साखर आणि मीठ यांचं प्रमाण अत्यंत जास्त असतं.

चिप्स, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, मोमोज, शीतपेयं आणि पॅकबंद स्नॅक्स यांसारख्या पदार्थांमधून मिळणारं पोषणमूल्य नगण्य असतं, पण यातल्या कॅलरीजचं प्रमाण मात्र खूप जास्त असतं. असे पदार्थ रोज खाण्यानं वजन वेगानं वाढतं. कालांतरानं, या लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.

चौदा वर्षांत जंक फूडच्या बाजारपेठेत दीडशे टक्क्यांची वाढ झाली आहे. ही भारतातल्या लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर बाब आहे.

अधिक वाचा  मतदारांसाठी धोक्याची घंटा! केवळ एकच दिवस उरला पुण्यातील २८ लाख मतदारांची नावे वगळली जाणार? आजच तपासा यादी

एका अहवालानुसार, भारतातील ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड’ खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेचा वेगानं विस्तार झाला आहे. 2006 मध्ये केवळ 0.9 अब्ज डॉलर्स इतकं मूल्य असलेली ही बाजारपेठ 2019 पर्यंत 37.9 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. 2009 ते 2023 या काळात अशा अस्वास्थ्यकर खाद्यपदार्थांच्या विक्रीत दीडशे टक्क्यांची प्रचंड वाढ झाली.