पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; तापमान वाढणार

0

राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच वातावरणात अचानक बदल होत असून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात वादळी पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.

७ ते ९ मेदरम्यान राज्यातील तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून, कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

अधिक वाचा  नसरापूर अत्याचार प्रकरण मन सुन्न करणारा घटनाक्रम; आधी आसरा… मग नजर…, संधी साधली तरीही असा बनाव

विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत आज वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतही वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अधिक वाचा  दादा गेले, पण वहिनींच्या पदरी भरभक्कम आघाडी;  सुनेत्रा पवारांची, दुसऱ्या फेरीतच विजयी वाटचाल

दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उद्या पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पुन्हा वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

शनिवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  देशाची राजकीय वाटचाल ‘त्रिकोणी’ ऐवजी द्विपक्षीय लढतीकडे? ‘ते’ एक दिवा स्वप्न अन् ‘या बड्या नेत्यांचाच’ करेक्ट कार्यक्रम!