तमिळनाडूतही अकल्पित घडणार एडापद्दी के पलानीस्वामी मुख्यमंत्री? काँग्रेसमुळे टीव्हीके अडचणीत? सत्तेसाठी हे दोन कट्टर विरोधक एकत्र

0

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला, परंतु, त्याला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.तामिळनाडूत अण्णाद्रमुक व द्रमुक हे दोन प्रस्थापित पक्ष सत्तेच्या नव्या समीकरणाचा विचार करत आहेत. विजयचा टीव्हीके पक्ष बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास पुढे काय करता येईल, याबाबत दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अण्णाद्रमुकने (AIADMK) आमदारांना पुद्दुचेरीतील रिसॉर्टवर हलवले आहे. तर दुसरीकडे तमिळनाडूचे राज्यपाल आज (गुरूवारी) केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बहुमत असल्याचे कागदोपत्री पुरावे सादर करावेत, असे राज्यपालांनी विजय यांना सांगितले होते. त्यामुळे विजय यांच्यासमोर सत्ता स्थापनेआधी अनपेक्षित अडथळा आला आहे. तमिळनाडूत द्रमुक व अण्णाद्रमुकमध्ये काय सुरू आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….

विजय यांना मुख्यमंत्री पद मिळवण्यात अडथळा

द्रमुक व अण्णाद्रमुक पक्षातील सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, जर विजय यांचा टीव्हीके पक्ष सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला, तर अण्णाद्रमुक हा पक्ष द्रमुक व इतर छोट्या पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करेल. “याबाबत अधिकृतपणे अद्याप काहीही झालेले नाही. पण, पक्षाअंतर्गत होणाऱ्या बैठका तसेच चर्चा यांतून ही शक्यता नाकारता येत नाही”, असे सूत्रांनी सांगितले. विजय यांच्या टीव्हीके पक्षासमोर सत्ता स्थापन करण्याआधी एक अनपेक्षित अडचण आली आहे. सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळण्याआधी बहुमत असल्याचे कागदोपत्री पुरावे सादर करावेत, असे तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विजय यांना सांगितले. त्यामुळे विजय यांना मुख्यमंत्री पद मिळवण्यात अडथळा आला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी पक्ष काँग्रेसचे समर्थन असलेल्या विजय यांच्या पक्षाविरोधात गेल्याचे दिसून येते. काँग्रेसने विजय यांच्याबरोबर सत्तेत जाण्यासाठी द्रमुक पक्षाबरोबर असलेली आघाडी तोडली. काँग्रेसकडे पाच आमदार आहेत.

अधिक वाचा  ममतांच्या सत्तेला सुरुंग लावणारे ते ‘मुद्दे’ नक्की कोणते? ज्यामुळे निकाल पालटले

११७ आमदारांचे समर्थन आवश्यक

तमिळनाडूत टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या. विजय यांनी दोन मतदारसंघांत निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाल्याने त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे टीव्हीकेच्या १०७ जागा होतील. बहुमतासाठी एकूण ११७ आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. द्रमुकने ५९ जागा आणि अण्णाद्रमुकने ४७ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांच्या आमदार संख्येची बेरीज १०६ होते. विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर बहुमत सिद्ध करू, अशी टीव्हीके पक्षातील नेत्यांची इच्छा होती. परंतु, राज्यपालांनी ठेवलेल्या अटीमुळे विजय यांच्या मार्गात अनपेक्षित अडथळा आला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी टीव्हीकेला इतर पक्षांच्या आमदारांचे समर्थन मिळवावे लागणार आहे. त्यामुळे द्रविड राजकारण करणाऱ्या प्रस्थापित पक्षांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. “पहिले पाऊल एआयएडीएमकेकडून टाकण्यात आले. त्याला डीएमकेने तात्काळ नाकारले नाही”, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अधिक वाचा  अच्छे दिन कधी येणार? : कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ

काँग्रेसमुळे टीव्हीके अडचणीत?

काँग्रेसने द्रमुकबरोबर असलेली आघाडी तोडून टीव्हीके पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय जाहीर केल्याने टीव्हीके पक्ष अडचणीत आला आहे. काँग्रेसने पुढील लोकसभा, राज्यसभा निवडणूक टीव्हीकेबरोबर मिळून लढण्याची घोषणा केली. त्यामुळे तमिळनाडूत राजकीय समि‍करणे बदलली. अनेक छोट्या पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्याचे ठरवले होते, तो पाठिंबा देणे त्यांनी स्थगित केले. विजय यांचा टीव्हीके पक्ष एकटा पडल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ नेते अंबुमणी रामाडोस (पीएमके पक्ष – ४ आमदार), थोल थिरूमावलवण (व्हीसीके पक्ष – २ आमदार), टी.व्ही. दिनकरण (एएमएमके – १ आमदार) या नेत्यांनी टीव्हीके पक्षाशी अप्रत्यक्षपणे बोलणी सुरू केली होती. परंतु, बुधवारी संध्याकाळी या पक्षांनी टीव्हीकेशी बोलणी थांबवली. विजय यांच्या नेतृत्वातील सरकारला समर्थन देण्यासाठी पुढे केलेला हात त्यांनी मागे घेतला. एनडीएतील मित्रपक्षांतील सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस – टीव्हीके यांच्यात आघाडी झाल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदल. एनडीएमधील दोन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे समर्थन असलेल्या टीव्हीकेला एनडीएतील मित्रपक्षांनी तमिळनाडूत सत्ता स्थापन करू देऊ नये, असे “दिल्ली”तून सांगण्यात आल्याचे सांगितले.

डीएमकेच्या एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेसच्या भूमिकेवर खासगीत राग व्यक्त केला. राहुल गांधी यांनी एक दिवसआधी एम.के. स्टॅलिन यांना फोनवर “मी तुमच्या बरोबर आहे”, असे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी काँग्रेस अधिकृतपणे टीव्हीकेबरोबर जात असल्याची घोषणा केली. “राहुल गांधी यांनी असे करायला नको होते. तामिळनाडूत काँग्रेसचे आमदार व खासदार आघाडीमुळे निवडून आले. डीएमकेने त्यांना पाठिंबा दिला नसता, तर काँग्रेसला तमिळनाडूत एकही जागा जिंकता आली नसती.”

अधिक वाचा  दक्षिणेत 5 राज्यांमध्ये 3 मुख्यमंत्र्यांसह 50 मंत्री पराभूत; फडणवीसांचा इशारा ‘ खाती नीट सांभाळा, नाहीतर….’

AIADMK ने आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवले

एआयएडीएमके मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या ५० आमदारांना पुद्दुचेरीतील ‘द शॉर त्रिश्वम’ रिसॉर्टमध्ये नेले जात आहे. त्यापैकी १५ आमदार पोहोचले असून इतर लवकरच पोहोचणार आहेत. पक्षाशी संबंधित चर्चा व बैठक तिथे होणार आहे. डीएमके व एआयएडीएमकेच्या गोटात सुरू असलेल्या चर्चांनुसार, विजय यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली जाईल. त्यात ते अपयशी ठरले तर एआयएडीएमकेचे एडापद्दी के पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले जाईल. डीएमकेचे त्यांना बाहेरून समर्थन असेल. तर छोट्या पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतले जाईल. दरम्यान, अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचे दोन्ही पक्षांतील सूत्रांनी सांगितले. एआयएडीएमकेच्या आमदारांची बैठक मंगळवारी व बुधवारी पार पडली. तर डीएमकेच्या आमदारांची बैठक गुरूवारी पार पडली. तामिळनाडूच्या राज भवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल गुरूवारी केरळला जाणार आहेत. टीव्हीके पक्षाचे नेते विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी गुरूवारी किंवा शुक्रवारी पार पडणार होता. परंतु, तो आता लांबणीवर पडला आहे.