ठाकरेंची ही खेळी अन् विधान परिषदेचे चित्रच बदलले; राष्ट्रवादीचा ‘अजितनीती’ डाव? फडणवीसांशी चर्चा पूर्ण

0

महाराष्ट्रात येऊ घातलेली विधान परिषद निवडणूक स्वतः न लढवता अंबादास दानवे यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मित्र पक्षांसह सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे निवडणुकीला कलाटणी मिळाली असून काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. मविआतील फुटीचा फायदा घेत आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने (अजित पवार गट) सुरू केल्या आहेत. भाजपनेही आणखी एक उमेदवार देण्याची चाचपणी सुरू केल्याने कालपर्यंत बिनविरोध होऊ पाहणारी निवडणूक आत्ता भयानक रंजक बनली आहे.

विधान परिषदेच्या १२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. उद्धव ठाकरे हेच ‘मविआ’चे उमेदवार असतील असे मानले जात असताना आदित्य ठाकरे यांनी दानवे यांचे नाव बुधवारी जाहीर करत काँग्रेस व राष्ट्रवादीलाही (शरद पवार गट) धक्का दिला. उद्धवसेनेने आमच्याशी चर्चादेखील केली नाही, अशी नाराजी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी मात्र, दानवे हे ‘मविआ’चे उमेदवार असल्याचा दावा केला.

अधिक वाचा  पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या…

उद्धव ठाकरेंनी सभागृहात जावे, अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. परंतु त्यांनी त्यांची जागा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानतो, अशी भावना उद्धवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. निवडणूक जिंकण्यासाठी २९ मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीकडे उद्धवसेनेचे २०, काँग्रेसचे १६ आणि शरद पवार गटाचे १० असे ४६ चे संख्याबळ असल्याने ‘मविआ’चा एक उमेदवार नक्कीच जिंकेल. काँग्रेसने साथ दिली नाही तरी उद्धव सेना आणि शरद पवार गटाचे मिळून ३० मते होतात.

शरद पवार गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची

राज्यसभेला आम्ही शरद पवार यांना पाठिंबा दिला, आता विधान परिषदेसाठी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, असे साकडे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्यांना घातले आहे. काँग्रेस १६, शरद पवार गट १०, सपा २, एमआयएम व माकपचे प्रत्येकी १ अशी ३० मतांची जुळवाजुळव करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

अधिक वाचा  AISCA तर्फे डिजिटल अवेयरनेस कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मोबाईल अ‍ॅपची घोषणा

…तर अजित पवार गटाचे दोन उमेदवार रिंगणात

काँग्रेसने उद्धवसेनेच्या अंबादास दानवे यांना पाठिंबा न देता स्वत:चा उमेदवार दिला तर विरोधकांमधील फुटीचा फायदा घेत राष्ट्रवादीकडून (अजित पवार ) दोन उमेदवार रिंगणात उतरविले जाऊ शकतात. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बुधवारी रात्री चर्चा केली. एक पक्षाचा अधिकृत आणि एक अपक्ष उमेदवार द्यायचा, अपक्ष उमेदवाराने अतिरिक्त मते खेचून आणायची आणि महायुतीने त्या अपक्ष उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची सर्व २३७ मते द्यायची अशी ही खेळी आहे. तसे झाले तर दानवे यांच्यासाठी निवडणूक कठीण असेल. अजित पवार गटाकडे अतिरिक्त ११ मते आहेत.

अधिक वाचा  पुण्यातील या नामांकित विधी महाविद्यालयावर मोठी कारवाई! विद्यार्थ्यांना व्याजासह पैसे परत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश