महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी आता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महत्वाचे म्हणजे, भाजपने यावेळीही धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. खरेतर, विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भाजपने मंगळवारी जारी केलेल्या या यादीत, सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि प्रमोद शांताराम जठार यांचा समावेश आहे.






तत्पूर्वी, राज्य भाजपने साधारणपणे ३० जणांची यादी पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठांकडे पाठवली होती. यानंतर, वरिष्ठांकडून ही यादी छोटी करून मागण्यात आली होती. यानतंर आता या पाच नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. याशिवाय, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपने जाहीर केलेले पाच उमेदवार
- सुनील कर्जतकर
- माधवी नाईक
- संजय नत्थूजी भेंडे
- विवेक कोल्हे
- प्रमोद जठार
कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांना संधी, भाजपने दिलेला शब्द पाळला
विवेक कोल्हे हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय समीकरणे पाहता पक्षाने त्यांची समजूत घालून त्यांना निवडणूक न लढण्याचे सांगितले. विशेष म्हणजे, खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे त्यांना नेऊन पक्षाची भूमिका त्यांना पटवून देण्यात आली होती. पक्षाच्या आदेशाचा मान राखत त्यावेळी कोल्हे यांनी माघार घेतली होती, ज्याचे फळ आता त्यांना मिळाले आहे.
ठाण्याच्या माधवी नाईक यांनाही संधी
माधवी नाईक या भाजपच्या प्रमुख महिला नेत्या आहेत. त्यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर, त्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर राहिल्या आहेत. त्यांच्या रूपाने भाजपने विधान परिषदेच्या यादीत महिलेला प्रतिनिधित्व दिले आहे.
सुनील कर्जतकर कोण आहेत?
सुनील कर्जतकर हे भाजपचे ज्येष्ठ आणि संघटनात्मक कामात सक्रीय असणारे नेते आहेत. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. संघटनेतील त्यांचे योगदान पाहून भाजपने त्यांना विधान परिषदेचे तिकीट जाहीर केले आहे.
संजय भेंडे -गडकरींचे अतिशय विश्वासू
संजय भेंडे हे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आरएसएसच्या मुशीत वाढलेले नेते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. ओबीसी चेहरा म्हणूनही भाजपने त्यांचे नाव पुढे केल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत नितीन गडकरींचे निवडणूक प्रमुख ते काम करतात. पक्षशिस्त, पक्षनिष्ठा पाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. संयमी, उच्चशिक्षित,सहकार क्षेत्रात त्यांचे चांगले कार्य आहे.
कोकणातून प्रमोद जठार यांना संधी
प्रमोद जठार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नेतृत्व आहे. अतिशय अभ्यासू आणि आक्रमक राजकारणी म्हणून प्रमोद जठार यांना ओळखले जाते. कॉलेज जीवनापासून त्यांनी भाजपचे काम केले. कोकणात भाजपचा आक्रमकपणे विस्तार करण्यात जठार यांचा सिंहाचा वाटा आहे.
प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी
काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना भाजपने संधी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पुन्हा सातव यांना संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये, यासाठी सातव यांना भाजपने प्रवेश देऊन मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा झाली.
माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यांच्या पदरी पुन्हा निराशा
भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यांच्या पदरी पुन्हा निराशा आलेली आहे. यंदा निष्ठावंतांना संधी दिली जाईल, असे पक्षाकडून सांगण्यात येत होते. मात्र पक्षाने पुन्हा भंडारी आणि उपाध्ये यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे.
या आमदारांचा कार्यकाळ संपणार –
येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या ९ सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड (भाजप) आणि प्रवीण दटके यांचा समावेश आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम –
- निवडणुकीची अधिसूचना जारी करणे – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)
- उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)
- मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)
- मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
- मतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजता
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)













