वारजे नगरामधील रामनगर वस्ती मध्ये सकल हिंदु समाज आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने कै. वनाबाई बराटे प्रा. शाळेच्या भव्य प्रांगणात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद करून मान्यवरांच्या हस्ते दीपपूजन, भारत माता, छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि सवत्स धेनु (गोमाता व वासरू) पूजनाने झाली. संमेलनाचे संयोजक ह.भ.प. श्री भाऊ महाराज फुरसुंगीकर ह्यांनी आपल्या वारकरी शैलीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले आणि हिंदुसंमेलन का आवश्यक आहे हे साध्या सोप्या भाषेत सांगितले.






धर्माचार्य महंत श्री श्रीकांत दास धुमाळ महाराज ह्यांनी आपल्या आशीर्वाचनात हिंदू संस्कृती, महिला संरक्षण, हिंदू संस्कृती जोपासना आणि आपले कुल धर्म कुळाचार पाळण्यासाठी आपल्या प्रभावी वाणीत योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई संबोधून शिक्षणासोबतच आपल्या मुलांवर हिंदू धर्माचे संस्कार करण्याचे आणि आठवड्यातून, 15 दिवसांतून किमान एकदा एकत्र येण्याचे आवाहन केले. मातृशक्ती वक्त्या वंदना ताई नवघरे ह्यांनी आपल्या सध्या आणि सोप्या भाषेत पंचपरिवर्तन विषय मांडणी केली. त्यात त्यांनी सामाजिक समरसतेचे उदाहरणात राम आणि शबरी संवाद सादर केला. तदनंतर आपले प्रमुख वक्ते श्री मुकुंदराव सहस्त्रबुद्धे ह्यांनी आपल्या सध्या शैलीत संघ की 100 वर्ष की गाथा ह्या विषयाची सुंदर मांडणी केली.
कार्यक्रमाचे विशेष म्हणजे स्थानिक बालकलाकारांनी सदर केलेले महाराष्ट्र गीत, शिव वंदना, शंभू वंदना, पोवाडा आणि विविध सांस्कृतिक नृत्य. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत पंडित ह्यांनी आपल्या सुश्राव्य वाणीत केले. आभार प्रदर्शन श्री चेतन गोंडाळ ह्यांनी केली आणि कार्यक्रमाची सांगता पसायदान आणि महाप्रसादाने झाली. या विराट हिंदू संमेलनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, विविध मंदिरे, गणेश मंडळे, शिवजयंती मंडळे, युवकांचे ग्रुप आणि परिसरातील सर्व सांस्कृतिक व विविध समाजाच्या मंडळांनी विशेष सहभाग नोंदवला. विशेष मान्यवरांमधे माजी महापौर श्री दिलीप भाऊ बराटे, युवा नगरसेवक श्री भारतभूषण बराटे, नगरसेवक श्री सचिन दोडके, नगरसेविका सायली ताई वांजळे, श्री किरण बारटक्के, श्री सचिन बराटे, श्री पराग ढेणे आणि वारजे नगरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रामनगर येथील सर्व जाती, पंथाच्या पुरुष, महिला, तरुण – तरुणी, लहान मुले- मुली यांनी एकत्र येऊन गेल्या दीड महिन्यापासून अतिशय नियोजनबद्ध काम करून हिंदू समाजाची एकजूट दाखवणारे हे भव्य दिव्य हिंदू संमेलन यशस्वी केले. मातंग वस्ती, रामनगर येथील लहान मुलांनी, तरुणांनी भोजन व्यवस्थेची (जेवण वाढण्याची) जबाबदारी घेऊन ती खूप छान पार पाडली.










