भिमाई रामजी आंबेडकर यांचा १३० वा स्मृतिदिन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने संपन्न

0

मुंबई दि. २८ (रामदास धो. गमरे) भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई रामजी सकपाळ तथा आंबेडकर यांचा १३० वा स्मृतिदिन बौद्धजन पंचायत समिती केंद्रीय कार्यालय येथे उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे संपन्न झाला.

सदर प्रसंगी विनोद मोरे यांनी भीमाबाई सकपाळ तथा आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ज्योत प्रज्वलित केली तद्नंतर बौद्धाचार्य मंगेश पवार गुरुजी यांनी धार्मिक विधी आपल्या गोडवाणीने संपन्न केला. तर चिटणीस यशवंत कदम यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन व प्रास्ताविक सादर करीत असताना भीमाबाईंच्या जीवनावर थोडक्यात माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात उपसभापती विनोद मोरे यांनी “माता भिमाईचा जन्म १४ फेब्रुवारी १८५४ साली ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे या गावात झाला त्यांचे वडील धर्माजी पंडित हे सुरवातीला मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्यांच्या माहेरची परिस्थिती श्रीमंतीची होती. त्या कष्टाळू, मेहनती, धार्मिक व संयमी होत्या. इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी झाला, रामजी सकपाळ हे सुरवातीच्या काळात १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्स या सैनिक तुकडीत शिपाई म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्यांची परिस्थिती सर्वसामान्य होती त्यावेळी भिमाई ने मनाशी निश्चय केला की आपल्या माहेरच्या परिस्थितीशी जेव्हा सासरची परिस्थिती येईल त्यावेळी आपण आपल्या माहेरी पाऊल ठेवू, वेळेसोबत रामजी आंबेडकर यांना सुभेदार पद मिळाले व त्यांचीही परिस्थिती बदलली व दोन्हीही कुटुंब गुण्यागोविंदाने वाटचाल करू लागले. भिमाई आंबेडकर या धार्मिक कर्तव्यदक्ष व संस्कारी होत्या, रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती त्यातील भीमराव यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला व भारत देशाचे भाग्यच बदलले जणू या महामानवालाच जन्म देण्यासाठी माता भिमाई जन्माला आल्या होत्या परंतु बाबासाहेबांना आईचा जास्त सहवास लाभला नाही बाबासाहेब ५ वर्षाचे असताना इ.स. १८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भी निधन झाले. माता भिमाई चा त्याग व विचार यांचा आदर्श घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे, बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने माता भिमाईच्या मुरबाड येथील आंबेटेंभे या मुळगावी भेट देण्याचे प्रयोजन करणार आहोत” असे नमूद करून माता भिमाईला अभिवादन केले.

अधिक वाचा  गुगल CEO सुंदर पिचाई यांना सर्वात मोठी पगारवाढ; दिवसाला 5.8 कोटी, महिना 11 आकडी पगार

सदर प्रसंगी अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, गजानन तांबे, धम्मयात्रा अध्यक्ष मुकुंद महाडिक, सचिव सुरेश मंचेकर, निवडणूक अधिकारी मिलिंद जाधव, अशोक कदम, राहुल कदम, प्रकाश कासे, कार्यालयीन सचिव संजय मोहिते, समाजसेवक प्रदीप तांबे तसेच विविध समितीचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून चिटणीस यशवंत कदम यांनी कार्यक्रमाची सांगता केली.