राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत दिवंगत नेते अजित पवार आग्रही होते, असा महत्त्वपूर्ण खुलासा पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला. अजित पवार आणि माझ्यात अलिकडच्या काळात अनेकदा सकारात्मक चर्चा झाली होती. जवळपास आठ ते दहा वेळा आमच्या भेटी झाल्या असून, “साहेबांच्या डोळ्यादेखतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पाहायच्या आहेत,” असे अजित दादा वारंवार सांगत होते, असे जयंत पाटील यांनी भावूक होत सांगितले.






जयंत पाटील म्हणाले, “अजित दादा अनेकदा संध्याकाळच्या वेळी माझ्या घरी येत असत. ते जेवण करूनच निघायचे. पहिल्या काही बैठका या केवळ भावना व्यक्त करण्यात गेल्या. साहेबांबद्दल ते नेहमीच प्रेमळ आणि आदराने बोलायचे. गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा विस्कळीत झाली असून ती नव्याने बांधण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.”
१६ जानेवारीला माझ्या घरी अजित दादा आले होते. त्या बैठकीला हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढवायच्या आणि त्यानंतर निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायच्या, असा निर्णय झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. “मी ८ फेब्रुवारीला दिल्लीला जाणार असल्याने पुढील दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे मी सांगितले. त्यावर अजित दादा म्हणाले, ‘जयंतराव, तुम्ही म्हणाल तसे.’ अखेर १२ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मधल्या चार दिवसांत आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करता येतील, असा आमचा विचार होता,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील बैठकींमध्ये अडीच वर्षांत घडलेल्या घटनांबाबतही सविस्तर चर्चा झाली होती. या काळातील वेदना आणि भावना अजित पवार यांनी आपल्याकडे व्यक्त केल्या, असे सांगताना जयंत पाटील भावूक झाले. माध्यमांशी बोलताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत जयंत पाटील यांनी केलेल्या या खुलास्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, अजित पवारांची अखेरची इच्छा काय होती, याचेही चित्र स्पष्ट झाले आहे.











