पुणे महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासूनच पुण्यामध्ये निष्ठावंत विरुद्ध आयात उमेदवार अशी चर्चा रंगत असताना राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी निष्ठावंत कार्यकर्त्यांना अन्याय सहन करावा लागू नये अशी भूमिका घेत चर्चेमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील वाढलेली भाजपच्या ताकदीमुळे यंदा महापालिका निवडणूक ही भाजपासाठी थोडी सोयीची असल्याने जास्तीत जास्त निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली परंतु पुणे शहरातील संधी साधू टोळीशी ‘मुरली’स्वर जुळतात संपूर्ण शहरांमध्ये कार्यकर्त्यांना आभाळ कोसळल्याची जाणीव झाली. अशातच मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने घरात उमेदवारी नको ही संजीवनी तयार झाली पण प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर (खास नातेवाईक) तुमची आमची भाजपा सर्वांची असे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळाले.






अनेक निष्ठावंतांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी पासून दूर राहावे लागले. नाराज झालेले निष्ठावंत सध्या सोशल मीडियाच्या माध्यम आणि इतर विविध माध्यमातून व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. तसेच काहींनी माध्यमांसमोरच अश्रू अनावर झाले. पुणे भाजपने तब्बल 45 माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले त्यामुळे नाराजांची संख्या ही मोठी आहे. ही नाराजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला परवडणारी नाही.
खासदार मेधा कुलकर्णी यांची सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपण कायम निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत असल्याचे संकेत देत गुलजार यांच्या कवितेच्या ओळी कुलकर्णी यांनी आपल्या फेसबूकवर शेअर केल्या आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘कुछ कह गऐ, कुछ सह गऐ, कुछ कहते कहते रहे गऐ’ तसेच आपल्या पोस्टमध्ये निष्ठावान कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरला आहे.











