पुण्यातील नाना पेठेत घडलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपींना काल (मंगळवार) पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांच्यासह सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी निलंजय वाडेकर यांचा समावेश आहे. या खटल्यातील युक्तिवाद आणि तपास अधिकाऱ्यांचे दावे यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. कोर्टात बंडू आंदेकर यांनी केलेल्या दाव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.






खून प्रकरणाची पार्श्वभूमी
आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता. पोलिसांच्या मते, ५ सप्टेंबर रोजी भवानी पेठेतील एका पार्किंगमध्ये यश पाटील आणि अमन पठाण यांनी आयुषवर पिस्तूलाने गोळीबार करून त्याची हत्या केली. अमित पाठोळे आणि सुजल मेरगुळ यांनी शस्त्र पुरवण्यासह रेकी आणि टेहळणी केल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. तपासात असे समोर आले आहे की, एकूण १३ जणांनी या खुनाचा कट रचला होता, आणि यातील पाच आरोपी अजूनही फरार आहेत.
तपास अधिकाऱ्यांचा कोर्टातील दावा
पोलिसांनी कोर्टात सांगितले की, “आंदेकर टोळीने हा खून टोळीयुद्धाचा भाग म्हणून केला आहे. यापूर्वी आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, आणि याच टोळीने त्याची रेकी केली होती.” तपास अधिकाऱ्यांनी पिस्तूल आणि गोळ्या कुठून आल्या याचा शोध घेण्याची गरज असल्याचे सांगितले. याशिवाय, आरोपींचे कपडे जप्त करणे आणि फरार आरोपींचा पत्ता शोधणे यासाठी अधिक तपासाची आवश्यकता आहे. “हे टोळीयुद्ध आहे, आणि हा खून सुनियोजित कटाचा भाग आहे,” असा दावा पोलिसांनी केला.











