भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

0

‘महापालिकेच्या प्रभागरचनेत भाजप हस्तक्षेप करत असल्याचे आम्ही आयुक्तांच्या यापूर्वीच निदर्शनास आणून दिले होते. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आमची भीती खरी ठरली,’ असा आरोप करत प्रभागरचना करताना नदी, नाले, मुख्य रस्ते यांसारख्या नैसर्गिक सीमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून प्रभाग करण्याऐवजी राजकीय सोयीनुसार प्रभागरचना केल्याची टीका कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभागरचना जाहीर केली असून, त्यावर हरकती-सूचना नोंदविण्याचे काम सुरू आहे. या प्रभागरचनेचा अभ्यास करून त्यातील त्रुटी मंगळवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकारांसमोर मांडल्या. यावेळी आमदार बापू पठारे, माजी आमदार दीप्ती चवधरी, गोपाळ तिवारी, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, अजित दरेकर, मेहबूब नदाफ आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  मुसळधार पावसाचा २१ जिल्ह्यांना अलर्ट; ताशी ७० च्या स्पीडने येतंय तुफान, येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस

शिंदे म्हणाले, ”निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार प्रभागरचना होणे अपेक्षित असते. परंतु, नियमावलीतील अनेक नियमांचे उल्लंघन करून प्रभागरचना तयार केली आहे. ती करताना नदी, नाले, मुख्य रस्ते यांसारख्या नैसर्गिक सीमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. वेडेवाकडे प्रभाग आखल्यामुळे नागरिकांना गैरसोय निर्माण होणार आहे.

काही प्रभागांमध्ये मागासवर्गीय वस्त्यांची जाणीवपूर्वक विभागणी केली आहे. यामागचा उद्देश म्हणजे त्या प्रभागात मागासवर्गीय समाजाला आरक्षण लागू पडू नये. ही बाब सामाजिक न्यायाला धक्का पोहोचवणारी आहे. भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्या प्रभागात अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण पडलेले नाही.”

अधिक वाचा  रुद्रम-II मिसाइलची यशस्वी चाचणी सुखोई-30 मधून शूट होताच थेट टार्गेट उद्धवस्त, सुरक्षा कवच भेदणं या सिस्टिममुळे शक्य

जगताप म्हणाले, ”काही प्रभाग चार वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतून भाग घेऊन तयार केले आहेत. यामुळे प्रशासकीय सुसूत्रतेचा अभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जाहीर केलेल्या प्रभागरचनेची स्थिती पाहता ती पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या राजकीय हस्तक्षेपाने तयार केली आहे.” प्रभागरचनेतील या त्रुटींवर दोन्ही पक्षाने हरकती नोंदविल्याचेही त्यांनी सांगितले.