मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये २००६ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अलीकडेच मुंबई हायकोर्टानं मोठा निकाल दिला होता. सर्व आरोपी निर्दोष असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सर्व आरोपींची सुटका झाली होती. पण हाय कोर्टाच्या या निकालावर आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता बाहेर आलेले सर्व आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार की बाहेर राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पण तूर्तास सर्व आरोपी हे तुरुंगाच्या बाहेरच राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टात सरकारकडून नेमका काय युक्तीवाद करण्यात आला. याची माहिती देखील समोर आली आहे. भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हाय कोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी केली. “आम्ही फक्त निकालावर स्थगिती मागत आहोत, आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी नाही”, असं तुषार मेहता यांनी कोर्टात सांगितलं.
यावर कोर्टाने म्हटलं की, “सर्व आरोपी आता जामिनावर सुटले आहेत, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. काही आरोपी पाकिस्तानी अधिकारी आहेत, त्यांचे काय? असा सवाल देखील कोर्टानं केलं. यावर मेहता म्हणाले, “ते अटक झालेले नाहीत, ते फरार आरोपी आहेत.” सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. मात्र आरोपींना पुन्हा तुरुंगात परत जाण्याची गरज नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील लोकल ट्रेनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सात बॉम्ब स्फोट झाले होते, ज्यामुळे मुंबई शहर हादरले होते. या हल्ल्यात 180 हून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असून, अभियोजन पक्ष त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले. या हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा निकाल आला आहे, ज्यामध्ये 180 हून अधिक लोकांचा बळी गेला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.