हवामान खात्याने महाराष्ट्रात 28 मे ते 31 मे 2025 दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. या चार दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मेघगर्जनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.






रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा घाट, पुणे घाट आणि कोल्हापूर घाट या भागांत 28 ते 31 मेदरम्यान अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांत भूस्खलन, पूर व पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. घाटमाथ्यावरील खेडी आणि पर्यटकांनी विशेषतः सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे या शहरांत 28 मे रोजी पावसाचा जोर राहणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक, लोकलसेवा, शाळा आणि कार्यालयीन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे.
विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, यवतमाळ, तर मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांचा कडकडाट आणि वादळामुळे वीज पुरवठा खंडित केला जाऊ शकतो. हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठीही अलर्ट जारी केला आहे. हळूहळू पावसाचा जोर 31 पर्यंत कमी होईल अशी शक्यता आहे. 29 मेपासून हळूहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. काही भागांत पावसाची तीव्रता कायम राहील. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट, पुणे घाट व कोल्हापूर घाट येथे 31 मे पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर भागांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
नागरिकांनी विजेच्या खांबाजवळ जाऊ नये, विजांचा कडकडाट होत असेल तर झाडाखाली, मोकळ्या जागेवर राहाणे टाळावे. विजांच्या कडकडाटात फोनवर बोलणं टाळावं, घरात टॉर्च, बॅटरी, पिण्याचे पाणी व औषधे ठेवावीत. फोन व्यवस्थित चार्ज करुन ठेवा. जेणेकरुन लाईट गेल्यानंतर संपर्क करण्यात अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाने केलं आहे.













