भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावात इंडियन प्रीमिअर लीग २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करावी लागली. आयपीएल २०२५ चे १६ सामने अजून शिल्लक आहेत आणि त्याबाबतचा निर्णय परिस्थितीवर अवलंबून आहे. यापूर्वीही ४ वेळा आयपीएल स्थगित करावी लागली आणि दुसरीकडे हलवली गेली होती. त्यामुळे बीसीसीआयला या परिस्थितीचा अनुभव आहे. बीसीसीआयकडे उर्वरित सामने खेळवण्यासाठी संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आदी पर्याय आहेत. त्यात इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही ( ECB) मदतीची तयारी दर्शवली आहे. पण, बीसीसीआय ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी भारतातील ४ शहरांची चाचपणी करत आहेत.






पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातली धर्मशाला येथे गुरुवारी झालेली लढत भारत-पाकिस्तान युद्धामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर दोन्ही देशांतील खेळाडूंना विशेष वंदे भारत ट्रेनने दिल्लीत सुखरूप पोहोचवले गेले. परदेशी खेळाडूंनाही त्यांच्या मायदेशात पाठवण्याची सोय बीसीसीआयने केली आहे. BCCI कडे अंतिम निर्णयासाठी आठवड्याचा कालावधी आहे.
ECB चे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड सांगितले की.”आम्ही बीसीसीआयला उर्वरित आयपीएलचे सामने खेळवण्यास मदत करण्यात तयार आहोत.
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय दक्षिण किंवा पूर्व भारतातील शहरांचा विचार करू शकते. बीसीसीआय त्यादृष्टीने काम सुरू आहे. बीसीसीआयला आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने भारतातच खेळवायचे आहेत आणि त्यासाठी कोलकाता, चेन्नई, हैदराबाद व बंगळुरू यांचा विचार करत आहे.
“अशा बाबींसाठी एक आठवडा खूप मोठा कालावधी असतो. बोर्ड योजना आखत आहे. पुढील आठवड्यात लीग पुन्हा सुरू झाल्यास कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्ये उर्वरित आयपीएल सामने खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. सीमेवरील परिस्थिती सुधारल्यास मूळ ठिकाणे देखील सामने होऊ शकतात,” असे एका सूत्राने सांगितले.











