देशातील साखर हंगामाची आकडेवारी समोर आली असून सलग तीन वर्ष साखरउत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र चालू हंगामात मात्र पुन्हा पिछाडीवर पडला आहे. उत्तरप्रदेशात ८७ लाख टन साखरनिर्मिती झाली असून अद्यापही ४८ कारखाने सुरू आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचा साखर हंगाम संपल्यात जमा असून केवळ ८० लाख टन साखरनिर्मिती झाली आहे.
इंडियन शुगर मिल असोसिएशन आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने मार्चअखेरचा साखरउद्योगाचा आढावा जाहीर केला आहे. यामध्ये देशात आतापर्यंत २४७ लाख टन साखरनिर्मिती झाली असून हंगामाअखेर एकूण २६४ लाख टनांवरच साखरनिर्मितीचे गाडे अडणार असल्याचा सुधारीत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गतहंगामात ३१९ लाख टन साखरनिर्मिती झाली होती. चालू हंगामात साखरनिर्मितीत ५४ ते ५५ लाख टन घट झाली असून त्याचे प्रमुख कारण महाराष्ट्र आहे. साखरनिर्मितीत महाराष्ट्रात तीस लाख टन, उत्तरप्रदेशात साडेनऊ लाख टन तर कर्नाटकता दहा लाख टन इतकी घट दिसून येत आहे.
मागील २०२३-२४ हंगामात महाराष्ट्रात ११० लाख टन तर युपीमध्ये १०४ लाख टन तर २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १०५ लाख टन तर युपीत १०४ लाख टन (खांडसरी वगळून) साखरनिर्मिती झाली होती. तसेच २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात १३८ लाख टन तर युपीत १०२ लाख टन साखरनिर्मिती झाली होती. तत्पूर्वी २०१६-१७ ते २०२०-२१ या चारही हंगामात युपीने अधिराज्य गाजविले होते. २०१५-१६ पर्यंत मात्र महाराष्ट्राचेच वर्चस्व अबाधित होते. आता पुन्हा एकदा युपीने कारखाने कमी असतानाही महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत काढली आहे. मार्चअखेर युपीमधील १२२ पैकी ४८ कारखाने चालू असून ८७ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे तर महाराष्ट्रात २०० पैकी केवळ सहाच कारखान्यांची धुगधुगी सुरू असून ८० लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. महाराष्ट्राला साखरनिर्मितीत मागे पडल्याचा फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
मार्चअखेर देशातील साखर उत्पादन (लाख टन)
उत्तरप्रदेश १२२-८७.५०
महाराष्ट्र २००-८०.०६
कर्नाटक ८०-३९.५५
गुजरात १५-८.२१
तामिळनाडू ३०-४.१६
अन्य ८७-२८.१३
उत्तरप्रदेश व महाराष्ट्र 10 वर्षाचे साखर उत्पादन (लाख टन)
हंगाम -युपी -महाराष्ट्र
२०१४-१५ -७१ -१०५
२०१५-१६ -६८ -८२
२०१६-१७ -८७ -४२
२०१७-१८ -१२० -१०७
२०१८-१९ -११८ -१०७
२०१९-२० -१२६ -६१
२०२०-२१ -११० -१०६
२०२१-२२ -१०२ -१३८
२०२२-२३ -१०४ -१०५
२०२३-२४ -१०४ -११०
२०२४-२५ -८७ -८०