आगामी काळात कार्यकत्यांची निवडणूक ‘स्थानिक’मध्ये विजयाचा संकल्प करा; भाजपच्या स्थापनादिनी बावनकुळे यांचे मोठं आवाहन

0

‘नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत. आगामी काळात कार्यकत्यांची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना कार्यकर्ते निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष भाजपसह महायुतीचे व्हावेत, यासाठी कार्यकर्त्यांनी विजयाचा संकल्प करावा,” असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भाजपच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित आभासी कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष अँड. आशिष शेलार, महासचिव राजेश पांडे यांच्यासह ३६ जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक वाचा  मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन

बावनकुळे म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला कमी मते मिळाली. त्यानंतर विधानसभेत विजयाचा संकल्प केला. विधानसभेत राज्याच्या जनतेने भाजप- महायुतीवर विश्वास टाकला आणि भाजपने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या. आज भाजपने राज्यात १ कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्य संख्या पूर्ण केली आहे. यासाठी भाजपच्या १ लाख सक्रिय कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली.

सरकारने घेतलेले जनहिताचे सर्व निर्णय या सदस्यांच्या माध्यमातून राज्यातील १४ कोटी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण संकल्पित व्हायला हवे. तसेच २०२५ मध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीच्या उमेदवाराला ५१ टक्के मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प करावा. पुढील १५ वर्षे महायुतीचे सरकार राज्याचा विकास करीत राहील,” असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

अधिक वाचा  पुणे शहरात 42 टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आठ मतदारसंघ प्रारूप मतदार यादीनुसार वगळलेली मतदारांची संख्या

महाराष्ट्र थांबणार नाही : फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील ४५ वर्षांत भाजपने कधीच लोकशाही सोडलेली नाही आणि घराणेशाही स्वीकारली नाही. भाजप लोकतांत्रिक मूल्यांवर चालणारा हा पक्ष आहे. भाजप कार्यकर्त्यांची मेहनत आणि राज्यातील जनतेने दर्शविलेल्या विश्वासामुळे आज पुन्हा राज्यात भाजप-महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. आम्ही १०० दिवस कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले सरकार कसे पारदर्शक आणि गतिशील आहे हे दाखवून दिले आहे. सरकार अशाच प्रकारे कार्य करीत महाराष्ट्राला देशाच्या सर्वोच्च स्थानावर नेल्याशिवाय थांबणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.