भारताची अंतराळ मोहिमेतील सर्वात मोठी झेप; मिशन चांद्रयान-5 मोहीम, भारत आणि जपान अंतराळ सहकार्यातील एक मैलाचा दगड

0

भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात एक मोठी भरारी घेत केंद्र सरकारने ‘चांद्रयान-5 मिशन’ला मंजुरी दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इसरो) अध्यक्ष वी. नारायणन यांनी ही माहिती दिली. या नव्या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास करण्यासाठी २५० किलोग्रॅम वजनाचा रोव्हर पाठवला जाणार आहे. यापूर्वीच्या चांद्रयान-3 मिशनमध्ये २५ किलोग्रॅम वजनाचा ‘प्रज्ञान’ रोव्हर पाठवण्यात आला होता.

चांद्रयान मोहिमांमधून भारताला जागतिक मान्यता

भारतातील अंतराळ संशोधनाला वेग देणाऱ्या चंद्रयान मोहिमांमुळे भारत आज जागतिक पातळीवर महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. २०२३ मध्ये इसरोने चंद्रयान-3 मोहिमेअंतर्गत लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरवले. हा ऐतिहासिक क्षण २३ ऑगस्ट २०२३ रोजी घडला आणि भारताने अंतराळ संशोधनात नवा मैलाचा दगड गाठला.

अधिक वाचा  राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, दिल्ली पोलिसांत पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, FIR मध्ये मात्र अजब नोंद

चांद्रयान-5 मोहिमेमुळे भारतीय वैज्ञानिकांना चंद्राच्या भूगर्भशास्त्रासंबंधी आणखी माहिती मिळेल आणि भविष्यातील चंद्रावरील मानवी वसाहतीच्या शक्यतांना चालना मिळेल.

चांद्रयान-5 मिशन: मोठा रोव्हर, मोठे लक्ष्य

नव्या मोहिमेअंतर्गत पूर्वीच्या चंद्रयान मोहिमेपेक्षा मोठा आणि अधिक शक्तिशाली रोव्हर चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. इसरोचे अध्यक्ष वी. नारायणन यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी इसरो जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या मदतीने काम करणार आहे. हा प्रकल्प भारत आणि जपान यांच्या अंतराळ सहकार्यातील एक मोठा मैलाचा दगड ठरेल.

चांद्रयान-4: २०२७ मध्ये चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न

इसरो २०२७ मध्ये ‘चंद्रयान-4’ मिशन प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर आणणे हा आहे. हे नमुने संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, चंद्राच्या भूगर्भशास्त्र आणि भविष्यातील संसाधनांच्या शक्यतांसाठी मार्गदर्शक ठरतील.

अधिक वाचा  पीएमआरडीएसमोर ७३५ हेक्टर भूसंपादनाचा मोठा पेच! ४४ कोटींचा निधी वर्ग संमती न देणाऱ्यांचे सक्तीने भूसंपादन

भारतातील अंतराळ संशोधनाचा सुवर्णकाळ सुरू

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अगदी वेगाने प्रगत तंत्रज्ञान विकसित करत आहे. ‘चांद्रयान’ मोहिमा, ‘गगनयान’ मानव मिशन आणि ‘आदित्य-एल1’ सौर मिशन यांसारख्या उपक्रमांमुळे भारताचा अंतराळ संशोधनातील दबदबा वाढला आहे. चंद्रयान-5 मोहिमेमुळे भारताला चंद्राच्या संशोधनात मोठे योगदान देता येईल आणि भविष्यात मंगळ तसेच अन्य ग्रहांवरील संशोधनाची दारे खुली होतील.