माझगाव दि. १० (रामदास धो. गमरे) बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय धर्मियांच्या ताब्यात आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारे आहे तसेच अनुचित पद्धतीने बौद्धांच्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण करणारे आहे तरी असे अतिरेकी अधिनियम रद्द करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा (झोन – १), बौद्धजन पंचायत समिती गट क्र. ३, दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ, संयुक्त माझगाव, बौद्ध विकास तथा सामाजिक संघटना तसेच माझगाव विभागातील विविध सामाजिक व धार्मिक बौद्ध संघटनांच्या तसेच तमाम बौद्ध बंधू-भगिनींच्या वतीने दि. ९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४:०० वाजता संविधान चौक, माझगाव येथे दक्षिण मुंबई अध्यक्ष भगवान तांबे, माझगाव सामाजिक संघटना अध्यक्ष यशवंत ओव्हाळ, सरचिटणीस सुरेश कांबळे, संदेश कांबळे, दीपक तांबे यांच्या नेतृत्वाखाली बोधगया मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठींबा देत धरणा आंदोलन करण्यात आले.
सदर प्रसंगी भगवान तांबे व उपस्थित मान्यवरांनी बोधगया मंदिर कायदा – १९४९ हा अनुचित कायदा कश्याप्रकारे बौद्धांच्या माथी मारून बौद्ध धम्माचे खच्चीकरण करण्यात येत आहे यावर प्रकाश टाकीत सरकारने लवकरात लवकर अन्यायकारक अधिनियम बी.टी. १९४९ हटवून महाबोधी महाविहाराचा संपूर्ण ताबा बौद्घ धम्मास द्यावा असे सरकारला सूचित केले.
सरतेशेवटी सर्व आंदोलनकर्त्यांनी बोधगया मुक्ती आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दर्शवून सभा तहकूब करून सरकारी नियमानुसार शांततेत आपापल्या गंतव्यस्थानी प्रस्थान केले.