महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. या कार्यक्रमामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर पाहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी शरद पवारांच्या गुगलीबद्दल विधान केले.
यंदा दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. त्या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंचाही सन्मान करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणात शरद पवारांबद्दल स्तुतीसुमन उधळली.
“शरद पवार सदाशिव शिंदेंचे जावई”
“हा पुरस्कार ज्यांच्या नावे आहे ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे आणि मी आहे कार्यकर्ता एकनाथ शिंदे. इथे पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे. ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“आजवर मला कधी गुगली टाकली नाही”
“सदाशिव शिंदे हे भारताचे प्रसिद्ध स्पीन बॉलर होते. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे. कधी क्लीन बोल्ड होईल ते कळायचे नाही. शरद पवारांचीही राजकारणातील गुगली अनेकांना कळत नाही. कधीकधी बाजूला बसलेल्यांची किंवा बसवल्यांची गुगली ते घेतात. माझे आणि शरद पवारांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही. यापुढेही टाकणार नाहीत”, असा विश्वास आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती”
“विचारधारा वेगळी असली तरी वैयक्तिक संबंध सगळ्यांनी टिकवायचे असतात. माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी आरोपांना कामातून उत्तर दिले. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं. काश्मीर मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या तलवारीच टोक पाकिस्तानकडे होत तेव्हा मी म्हणालो होतो पाकिस्तान वाकड्या नजरेने आपल्याकडे पाहणार नाही. आज बाळासाहेब आणि दिघे साहेब असते तर त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
हा पुरस्कार मी माझ्या मनाच्या कोपऱ्यात ठेवेल. महाराष्ट्राची सेवा मी मनापासून करत राहील. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी रत्न झाली त्यामुळं आपण मराठी आहोत हे अभिमानाने सांगू शकतो. महादजी शिंदे नसते तर इंग्रज ५० वर्ष आधी आपल्याकडे आले असते. म्हणजे २०० वर्ष आपल्याला इंग्रजांची गुलामगिरी पत्करावी लागली असती. इंग्रजांनी त्यांना ग्रेट मराठा ही पदवी बहाल केली होती, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.