सुरेश धस मागे लागले की डोकंही खाऊन टाकतात; आधुनिक भगीरथ म्हणत  फडणवीसांकडून कौतुक

0

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी सुरेश धस यांनी अनेक मोर्चे देखील काढले होते. या प्रकरणात सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरेश धस यांना आवर घालण्याची मागणी करण्यात येत होती. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांचे जोरदार कौतुक केलं आहे. आमदार सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

बीडच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या कामाचे कौतुक केले. या कामामुळे आमदार सुरेश धस यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं.

“या प्रकल्पाला २०२२ मध्ये आमच्या सरकारने सुप्रमा दिली. या प्रकल्पाला ११ हजार कोटी रुपयांची सुप्रमा दिली आहे. कारण सुरेश धस एकदा मागे लागले तर ते डोके खाऊन टाकतात, हा शब्द चुकीचा असला तरी त्यांच्यामुळे आता हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. धाराशिव जिल्हा आणि आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. या भागातला दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे, संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे