मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज (3 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवर भाष्य केलं. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटायला आले होते, असं मनोज जरांगे यांनी सांगितले.






मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. 8 दिवसांपासून फोन येत होते. रात्री 2 वाजता आले, सोबत कराड होता. आणि मला सांभाळा असे म्हटलं. मी झोपलो होतो ते आत आले. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असं त्यांना म्हटलं होतं. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जाताना पाया पडले, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला. दरम्यान, आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहे. याच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण-यातना भोगल्या या टोळीमुळे, असा दावाही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.
महंत नामदेवशास्त्रींवर मनोज जरांगे काय म्हणाले?
महंत नामदेवशास्त्री यांचं सर्व उघड पडत आहे, जे बोलायचं आहे ते बोलून गेले, टोळीने दाखवलं किती जातीवाद असतो. असे जातीवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत. आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्रचं नुकसान करणारे आहे, पोटातील ओठावर आले. बाबाला दोष देत नाही, करून घेणारी टोळी आहे.स्वतः साठी देवधर्म कळेना…. काही लोकांनी ओबीसीच्या नावाखाली अन्यथा सहन केला. ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला… आता लोक व्यक्त होत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.













