बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व पुरावे आणि कागदपत्रे घेऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सुमारे तीस मनिटं त्यांच्यात चर्चा झाली. पण अजित पवारांनी दमानिया यांना काय सांगितलं? या बैठकीत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात…..






बैठक संपल्यानंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर अजित पवारांशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. त्या म्हणाल्या, मी जवळपास २५ ते ३० मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं होतं की, बीडमध्ये झालेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्याचं मी कुठेही समर्थन करत नाही. त्यामुळं मग तुम्ही धनजंय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही? असा प्रश्न त्यांना मी विचारला. तुम्ही पुरावे मागत होतात तर त्याचे सर्वच्या सर्व पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले. धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र व्यवसाय कसे आहेत? त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय? तसंच हे सर्वकाही कसं ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये बसतं? हे मी त्यांना दाखवलं.
यासाठी धनजंय मुंडे यांचा राजीनामा त्यांनी का घेतला पाहिजे? हे सांगताना त्यांना मी गृहमंत्रालयाचे अशा गुन्ह्यांबाबत आमदार आणि खासदारांसाठी काय दिशानिर्देश आहेत? हे मी त्यांना दाखवलं. या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधी कायदा १९५१ याच्यानुसार १०२ (१)(अ) आणि १९१ या दोन कलमांतर्गत असं स्पष्टपणे लिहिलं आहे की, कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही. मग यांनी महाजेनकोकडून यांना कसा नफा मिळतोय याची कागदपत्रे दाखवली.
त्यानंतर त्यांची असलेली दहशत दाखवली. तसंच त्यांचे समर्थकच नव्हे तर दहशतवादी कसे आहेत, त्यांनी बीडमध्ये जी मोठ्या प्रमाणावर दहशत माजवली आहे. त्याचे फोटो आणि रिल्स त्यांनी शांतपणे पाहिले. त्यानंतर अजित पवार म्हणाले की, उद्या दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक आहे, यावेळी ते आज मी दिलेल्या कागदपत्रांवर चर्चा करतील. त्यानंतर ते पुढचा निर्णय घेतील, असं त्यांनी मला सांगितलं आहे. मला खात्री आहे की जनतेचा जो आक्रोश आहे त्यानुसार, कारवाई होणं अपेक्षित आहे.
आत्ताच्या घटकेला अजित पवारांनी जे सर्वकाही समजून घेतलं, बघितलं त्यानंतर त्यांना यातील अनेक गोष्टी माहिती देखील नव्हत्या. त्यानंतर अनेक रिल्समधून बीडमध्ये कशी दहशत करुन ठेवली आहे, हे त्यांना दाखवलं. आज मी त्यांना सह्यांनिशी कागदपत्रे दाखवली आहेत, त्यामुळं त्यावर शंका राहण्याचा प्रश्नच येणार नाही. यामध्ये सरसरळ ते महाजेनकोमधून फ्लायअॅश विकत असल्याचं उघड झालं आहे. याबाबतच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट कोणताही आमदार किंवा खासदार मिळवू शकत नाही, हे दाखवल्यावर ते गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हा दखलपात्र गुन्हा असून निवडणूक आयोगानं ठरवलं तर त्यांचं मंत्रीपदच काय तर आमदारकी देखील रद्द होईल. पण जर त्यांनी यावर कारवाई केली नाही तर हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना आधीच पत्र दिलेलं आहे. त्यांच्याकडं मी याबाबत सुओमोटो दाखल करुन घेण्याची विनंती केली आहे. न्यायाधिशांना मी जे पत्र लिहिलं आहे त्यावर कारवाई होईल अशी मला अपेक्षा आहे. अन्यथा मी रिट पेटिशन दाखल करणार आहे. हे खरंतर रिटपेक्षा जनहित याचिका आहे.













