मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी ता. नऊ डिसेंबरला हत्या झाली. यानंतर ता. ११ डिसेंम्बरला या हत्येशी संबधित असलेल्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ता.१२ डिसेंबर रोजी माजी पालकमंत्री यांच्या बंगल्यावर खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि तिथून आरोपी फरार झाला, असा गंभीर आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.






सरपंच संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणाने जिल्हा राज्यात चर्चेत आहे. रोज नवनवे आरोप आणि खुलासे होत असून या सर्वांच्या केंद्रस्थानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवावा या मागणीसाठी बीड, परभणी, जालना, पुणे आणि धाराशिव या ठिकाणी मोर्चेही निघाले.
आता खासदार सोनवणे यांनी आणखी एक आरोप केला. बजरंग सोनवणे म्हणाले, ता. २८ मे २०२४ रोजी खंडणीच्या प्रकरणाला सुरूवात झाली. यानंतर २९ नोव्हेंबरला पुन्हा खंडणी मागितली. पुढे ता.६ डिसेंबर रोजी खंडणीवरून अवादा कंपनीच्या परिसरात वाद झाला. याच वादाचा राग मनात धरून ता. ९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचा निघृर्न खून करण्यात आला. खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला. पुढे ता. १२ डिसेंबर रोजी हाच आरोपी माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक करतो आणि तिथून निघून जातो.
इतकी दहशत पोलीस प्रशासनावर होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर तिसऱ्या आरोपींचे कनेक्शन धाराशिवमार्गे पुण्याला लागतंय का बघा?, कारण माझ्या बोलण्यामागे काही लॉजिक होतं. पुढे हा आरोपी धाराशिवमार्गे पुण्याला गेल्याचं सापडलं. खंडणीतील आरोपी पुण्याला सरेंडर होतो. खंडणीच्या आरोपीवर ११ तारखेला गुन्हा दाखल झाला.
मात्र, १२ तारखेला बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या ऑफिसमध्ये खंडणीतील आरोपी अन् पोलीस अधिकारी यांची भेट झाली हे आपण खात्रीने सांगत आहोत असेही बजरंग सोनवणे म्हणाले.
वाल्मिक कराडला पोलिसांची सुरक्षा आहे, तो कुठल्या पदावर आहे हे मला माहिती नाही. पण, त्यांनाही पोलीस गार्ड आहेत, हे गार्ड आरोपीसोबत कसे काय?, असे सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. ११ डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून आरोपीला कोणी-कोणी मदत केली. ३१ डिसेंबरला अटक होईपर्यंत २१ दिवस आरोपीला ज्यांनी मदत केली, त्यांना सह-आरोपी का केलं जात नाही, असा सवालही त्यांनी केला.
संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना पोलीस प्रशासनावर भरवसा राहिलेला नाही. त्यांनी एसआटीमध्ये खंडणीतील आरोपींच्या मनावर अधिकारी नियुक्त केल्याचे त्यांना वाटत असावे, यामुळे एसआयटीतील अधिकारी बदलावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे भेटून केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण द्याल ती नावाचे अधिकारी देतो, असे म्हटले होते. परंतु अद्याप ते अधिकारी बदलले नाहीत, असेही सोनवणे यांनी म्हटले.
खंडणी आणि खून हे प्रकरण एकमेकांशी संबधित आहेत. या प्रकरणात खंडणीतील आरोपींशी ज्यांचे संबंध आहेत, अशा अनेकांना एसआयटीने चौकशीसाठी बोलविले होते. त्या सर्वांची नावे जाहिर करण्यात यावीत. त्या लोकांचे आरोपींशी काय संबंध आहेत, हे लोकांना कळले पाहिजे. याच बरोबर खून आणि खंडणीतील आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणीही बजरंग सोनवणे यांनी केली.











