‘महायुतीतील पालकमंत्र्यांचा विषय मार्गी लागलेला आहे. १५ ते १६ जानेवारीपर्यंत पालकमंत्रिपद विषयाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आमच्या आतापर्यंत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. कोणाला कुठल्या जिल्ह्यात नियुक्त करायचे याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे २६ जानेवारीला झेंडावंदन कोणी करायचे यावर तोडगा निघालेला असेल,” असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.






ते म्हणाले, ”स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप तयार आहे. जेव्हा निवडणुका लागेल त्यावेळी आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरू. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांबरोबर जाऊन काम करू. भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे. असे असले तरी महायुती म्हणून आम्ही निवडणुकीत पुढे जाऊ.”
महाविकास आघाडीबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, की ‘इंडिया’ आघाडी अविचारी असल्यामुळे ती जास्त काळ टिकणार नाही. तसेही या आघाडीचे भविष्य संपले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीही संपल्यात जमा झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांना आपली ताकद अजमावून बघायची असल्याचे संजय राऊत यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
शक्तिपीठासाठी शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे
शक्तिपीठ संदर्भात जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ते प्रश्न सोडून आम्ही पुढे जाऊ. शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल, मनात शंका असेल त्याबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावरच पुढे पाऊल टाकू. शेतकरी समर्थन करेल त्या पद्धतीने आम्ही काम करू असेही त्यांनी सांगितले.
राऊत यांनी स्वतःचा पक्ष वाढवावा
संजय राऊत दिवसभर वटवट करीत असतात. ते पराभवाच्या मानसिकतेत आहे. अंधारात दिवा घेऊन फिरत आहे. आता त्यांची वेळ संपली आहे. महाराष्ट्राशी गद्दारी केली. पुढच्या काळात त्यांना भविष्य नाही. त्यांनी रोज टीव्हीसमोर येऊन टीका करण्यापेक्षा आपला पक्ष वाढवावा, असा टोमणाही बावनकुळे यांनी लगावला.
जुन्या गोष्टी काढून राजकारण करता येणार नाही. आता नवीन काळ सुरू झाला आहे. राऊत यांना दररोज सकाळी काही सुचवायचे असेल त्यांनी विकासावर बोलावे. रोजचे टोमणे बंद झाले पाहिजेत. महाराष्ट्राला विकासाकडे नेले पाहिजे. विरोधकांनी महाराष्ट्राच्या विकासाला साथ द्यावी. आम्ही त्यावर काम करू असेही बावनकुळे यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना सुरू राहील. कोणावर कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतले असेल तर अनुदान ते बंद होईल.
– चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष













