वाल्मिक कराडला कोण वाचवतंय? व्हिडिओ कॉलवर क्रूर हत्या पाहणारा आठवा आरोपी मकोका बाहेर कसा? अंजली दमानियांनी विचारला जाब

0

महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामधील सात आरोपींना मकोका लावण्यात आला. खून झाल्यापासूनच नाही तर त्याअगोदर सुद्धा हे आरोपी संघटित गुन्हेगारी करत असल्याचे समोर आले होते. पण आरोपींनी हे कृत्य कुणाच्या इशाऱ्यावरून केले यावरून आता पुन्हा वाद उफळला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, प्रकाशदादा साळुंके, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी संशयाची सुई थेट वाल्मिक कराडकडे वळवली आहे. आता तोच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला धारेवर धरले आहे. वाल्मिक कराडला कोण वाचवतंय असा सवाल आता अंजली दमानिया यांनी केला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मग आठव्या आरोपीला कुणाचा वरदहस्त

अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून माहिती आहे की सात जणांनी खून केला, असे दमानिया म्हणाल्या. सात आरोपींवर मकोका लावला. पण आठव्या आरोपीला, जो व्हिडिओ कॉलवर अजून मारण्यास सांगत होता, तो कसा सुटला असा सवाल दमानिया यांनी केल. त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? त्याच्यावर कारवाई करण्याची हिम्मत शासनात नाही का? असा सवाल दमानिया यांनी केला. गृहमंत्रालयावर त्यांनी ताशेरे ओढले.

गृहमंत्रालयाचे काढले वाभाडे

मे महिन्यापासून याप्रकरणात आवादा कंपनीकडून सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह इतर आरोपींची नावे येत होती. तर त्याचवेळी कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला. मे महिन्यापासून ते डिसेंबर 2024 पर्यंत टाईमपास करण्यात आला. वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुख जिवंत असते, असे त्या म्हणाल्या. इतके मोर्चे निघत आहेत. आक्रोश होत आहे. तेव्हा एका महिन्यानंतर सरकार उपकार केल्यासारख मोकाकाची कारवाई करत असल्याचा घणाघात त्यांनी घातला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

वाल्मीक कराड वाचवले जात आहे का?

वाल्मीक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखा त्याला वागवला जात आहे, असे दमानिया म्हणाल्या. वाल्मीक कराड यांचं सगळ्यांबरोबर अगदी चांगलं गणित आहे. त्याच्यावर धनंजय मुंडे आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. जोपर्यंत दबाव आहे, तोपर्यंत वाल्मिकवर मकोका लावण्यात येणार नाही असा आरोप त्यांनी केला.