”सकाळ’ माध्यम समूहाच्या पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेष संवादसत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर इकोनॉमीचे भारतातील पहिले राज्य कसे ठरू शकते’ याविषयी व्हिजन मांडले. त्याच वेळी त्यांनी राज्यातील समृद्धी महामार्ग, नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण बंदरानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पुढच्या ड्रीम प्रोजेक्टची घोषणा यावेळी केली.






समृद्धी महामार्गाचे ज्यावेळेस पहिल्यांदा सर्वांसमोर सादरीकरण केले. त्यावेळी बऱ्याच जणांनी हा प्रकल्प पूर्ण होणार का? अशी शंका उपस्थित केली होती. मात्र, थांबलो नाही, काम करीत राहिलो. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी 700 किलोमीटर जमीन केवळ नऊ महिन्यात अधिग्रहित करून पहिले पाऊल टाकले. त्याचा फायदा लवकर काम पूर्ण करण्यासाठी झाला. या महामार्गाचा सर्वांना फायदा होत आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्याजवळील पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती दिली जाईल. हे काम पूर्ण करताना कितीही अडचणी आल्या तरी येत्या काळात हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
चार नदी जोड प्रकल्प पूर्ण करणार
राज्यात येत्या काळात चार नदी जोड प्रकल्पाचे काम हाती घेणार आहे. राज्यातील पहिला नदी जोड प्रकल्प विदर्भात होत आहे. त्यासोबतच गोदावरी खोऱ्यातून समुद्राला वाहून जाणारे 54 टीमसी पाणी चार प्रमुख नदी जोड प्रकल्पातून पिण्यासाठी व शेतीसाठी वापरात आणले जाणार आहे असून त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. या माध्यमातून येत्या काळात राज्यातील दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे. त्यामाध्यमातून येत्या पाच वर्षात राज्य दुष्काळमुक्त करून दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधाचे मोठे प्रकल्प पूर्ण करणार
समृद्धी महामार्गाचा फायदा सर्वाना होत आहे. 700 किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ जवळ आला आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग आले आहेत. त्यासोबतच येत्या काळात शक्तीपीठ महामार्गाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न असणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य एक्स्पोर्टचे हब होणार
‘जेएनपीटी’च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर होत आहे. हे मोठं वाढवण बंदर तयार झाल्यानंतर त्याचा त्याचा फायदा संपूर्ण राज्याला होणार आहे. त्या माध्यमातून येत्या काळात राज्य एक्स्पोर्टचे हब होणार आहे. त्या माध्यमातून हे सर्व पायाभूत प्रकल्प राज्याला पुढे घेऊन जाणाते ठरणार असल्याने त्या माध्यमातून राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
2029 साली महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असणार
2029 साली सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असणार आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळखले जाणार आहे. यामधील काही प्रकल्प येत्या काळात पहिल्या वर्षीच पूर्ण झालेले दिसतील. त्यामुळे येत्या काळात राज्याची चौफेर प्रगती झाल्याचे दिसेल. त्यामुळे पाच वर्षानंतर राज्यातील सर्वच पायाभूत प्रकल्प पूर्ण झालेले दिसतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.











