महाराष्ट्राचं पुढील पाच वर्षांचं व्हिजन काय असेल? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे मांडलं आहे. पुण्यात सकाळ माध्यम समुहानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विभागांना शंभर दिवसांचं टार्गेट दिल्याचं सांगितलं. तसंच १५ एप्रिलपर्यंत या टार्गेटचं काय झालं हे कसं तपासलं जाईल याची रुपरेषाही सांगितली.






फडणवीस म्हणाले, “मी सर्व विभागांना सांगितलं आहे की, तुमचं पहिलं टार्गेट शंभर दिवसांचं आहे. तुम्ही शंभर दिवसात काय अचिव्ह करु शकता? याचं प्रेझेन्टेशन तुम्ही करायचं. त्यांचं टार्गेट त्यांनी ठरवून माझ्यासमोर मांडलं आहे. फिल्डवरचे जे सहकारी आहेत त्यांना सात सूत्री कार्यक्रम दिला आहे. यामध्ये एखाद्या सरकारी कार्यालयात ज्या दोन गोष्टींसाठी लोकांना सर्वाधिक वेळा जावं लागलं त्या गोष्टी त्यांना सलभतेनं कशा मिळतील, म्हणजे इज ऑफ लिव्हिंग कसं होईल, असा कार्यक्रम क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आला आहे”
मला असं वाटतं की, इतक्या वर्षाच्या अनुभवानुसार सरकार या मशिनरीची क्षमता खूप आहे पण त्याला मिशन मोडवर आणावं लागतं. म्हणून शंभर दिवसांच मिशन आपण यांना दिलं आहे. त्यानुसार प्रत्येक विभागानं आपले गोल्स तयार केले. यानंतर शंभर दिवस पूर्ण होतील म्हणजे तीन-साडेतीन महिने पूर्ण होतील. म्हणजेच १५ एप्रिल दरम्यान प्रत्येक विभागानं शंभर दिवसात काय करायचं ठरवलं होतं? आणि त्यातील त्यांनी काय साध्य केलं आहे. याचा आम्ही आढावा घेणार आहोत, त्याची पुस्तिकाही प्रकाशित करणार आहोत.
दरम्यान, पारदर्शिता आणि गतीशीलता या दोन गोष्टींचा आमच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात अंतर्भाव आहे, तसंच जी दिशा आमची ठरली आहे त्यावर आमचं काम सुरु आहे, असं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.











