महाराष्ट्र आता कायमचा दुष्काळ मुक्त होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासाठी चार प्रकल्पांना नुकतीच मान्यता दिल्याची माहितीही त्यांनी दिली. सह्याद्री वाहिनीला मुलाखतीत त्यांनी ही घोषणा केली. हे प्रकल्प नेमके कोणते आहेत? जाणून घेऊयात. नव्या सरकारसाठी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी टॅगलाईन आता भाजपनं दिली आहे. पण तो पुढे कुठल्या दिशेनं जाणार आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात आमचं सरकार आलं. शिंदे मुख्यमंत्री होते तर मी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतो.






त्यानंतर आम्ही तिघांनी महाराष्ट्राला वेगानं ट्रॅकवर आणलं.
मी आधी मुख्यमंत्री असताना ज्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली होती ते प्रकल्प सुरु केले, काहींना गती दिली. काही प्रकल्प पूर्ण झाले, काहीचं लोकार्पण झालं अनेक नवीन योजना आपण सुरु केल्या. आता या सगळ्या योजना आणि प्रकल्प वेगानं पुढे नेण्याकरता महाराष्ट्र आता थांबणार नाही. कारण महाराष्ट्राच्या जनतेनं आता जनादेश दिला आहे. येत्या काळात गोष्टी तर अनेक करायच्या आहेत पण माझा भर जो असणार आहे. तो नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे. कारण मी आत्ता इरिगेशन मिनिस्टर म्हणून चार नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करु शकतात, कायम ! त्यामुळं या नदीजोड प्रकल्पांवर माझा भर राहणार आहे. तसंच ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे.
कारण मागच्या काळात जवळपास ५४ हजार मेगावॅटचे वेगवेगळे प्रकल्प हातात घेतले होते. या प्रकल्पांमुळं २०३० मध्ये महाराष्ट्रातील ५२ टक्के वीज ही ग्रीन एनर्जी असणार आहे. या सगळ्या प्रकल्पांमुळं शेती आणि उद्योग क्षेत्रांना प्रचंड फायदा होणार आहे. यामुळं महाराष्ट्रात रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल.











