शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावं, अशी बोचरी टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. शरद पवार यांनी लोकांचे वाटोळे केले. त्यांनी आता जनता आणि राज्याचं आणखी वाटोळं करु नये, असेही विखे-पाटील यांनी म्हटले. मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारपासून मतदारसंघात सक्रिय झाले. त्यांनी अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली.
यावेळी त्यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनाही फटकारले. लोकसभा निवडणुकीत मविआला घवघवीत यश मिळाले, महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यावेळी EVM बाबत शंका व्यक्त का केली नाही ? EVM वर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा देवून टाकायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. जनमत बाजूने असलं की EVM चांगलं आणि विरोधात गेल की EVM वाईट, असे विरोधकांचे धोरण असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले.
माझ्यावर ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशीर्वाद राहिला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशीर्वाद आहे. मला दिलेल्या संधीचं मी चांगल काम करुन दाखवलं आहे. तो विश्वास पुन्हा पक्षनेतृत्व व्यक्त करेल, अशी अपेक्षा विखे-पाटील यांनी व्यक्त केली.