नवी दिल्ली : देशात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. असं असूनही, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) 16 ऑक्टोबरपर्यंत 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशातील अनेक भागांत पुढील काही दिवसांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.आयएमडीच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग, बिहार आणि झारखंडमधून माघारी जाण्याची शक्यता आहे. या दरम्यान अनेक राज्यांमध्ये विशेषतः दक्षिण द्वीपकल्पीय भारतामध्ये मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, तामिळनाडू आणि पाँडीचेरीमध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत, केरळमध्ये पुढील सहा दिवसांत आणि आंध्र प्रदेशमध्ये 14 ते 16 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. कर्नाटकातही 14 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडेल. तामिळनाडू आणि केरळमध्ये 14 आणि 15 ऑक्टोबरला जोरदार पाऊस पडू शकतो.
तसेच आज (14 ऑक्टोबर) गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, विदर्भ, छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिल्लीतील वातावरण अंशतः ढगाळ असेल आणि कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस असेल. राष्ट्रीय राजधानीसाठी हवामानाबाबत कोणताही विशेष अलर्ट नाही.
बिहारचं हवामान कसं असेल?
बिहारमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हवामानखात्याच्या म्हणण्यानुसार, 18 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. पण, चक्रीवादळाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सुपौल, अररिया, किशनगंज आणि भागलपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील सहा दिवस राज्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातील हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. रात्रीचं तापमान हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. दिवसा तापमापकाचा पारा किंचित वाढू शकतो, त्यामुळे आर्द्रताही वाढेल. पश्चिमेकडील वाऱ्यांच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण होत आहे. दिवाळी व छठ सणाच्या आसपास थंडीला सुरुवात होऊ शकते.