लोकसभा निवडणुकीत महाविजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्याची झलक विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकते, असे संकेत खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आज दिले. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यापैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास ठाकरेंनी व्यक्त काल आहे. याबाबत आपले गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचे सूचक विधानही केलं आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढणार आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
विधानपरिषदेची निवडणूक लढणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, 11 जागा आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक आमदार निवडून येऊ शकतो. वरची कॅलक्युलेशन सांगण्याची नसतात, जयंत पाटलांना (शेकाप) एनसीपी उमेदवारी देणार असेल तर तेही निवडून येऊ शकता.
कॉग्रेसकडे 44, शिवसेनेकडे 16 आणि एनसीपीकडे 13 मतं आहे. अशावेळी कोटा पाहता 3 आमदार कसे निवडून येणार, यावर बोलताना ठाकरेंनी सूचक विधान केले. या सगळ्या गोष्टी आता उघड करून सांगितल्या तर मी निवडणूक कशी लढू? आमचं गणित पक्कं आहे. 11जागांमध्ये एक शिवसेना, एक कॉंग्रेस आणि एक राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येतो.
आम्ही जेव्हा निवडणूक लढतोय आणि प्रत्येकाचा एक-एक निवडून वैतोय, याची आम्हाला खात्री असेल तर साहजिकच आहे त्यांनी त्यांची मतं कशी सांभाळायची हा त्यांचा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बऱ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक झाली तर गंमतीशीर होणार आहे. पेढे गुप्तपणे कोण कुणाला भरवतंय, हे तुम्हाला कळेल, असं म्हणत ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढवलं आहे.