मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) नको या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे जालन्यातील (Jalana) वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. नुकतेच त्यांनी आपले उपोषणाचे हत्यार म्यान करत आंदोलन तात्पुरता थांबवले आहे. उपोषणानंतर त्यांची प्रकृती काहीशी खालावली असल्याने त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर आता मात्र प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना नुकतेच दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर आजपासून ते आपल्या अभिवादन दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.






सुरुवातीला ते बुलढाणा जिल्ह्यातील माँसाहेब जिजाऊचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील राजे लहुजी जाधव यांच्या राजवाड्यात जाऊन जिजाऊंना अभिवादन करतील. याच ठिकाणावरून त्यांचा अभिवादन दौरा सुरू होणार आहे. त्यानंतर ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी कडे प्रयाण करणार आहेत. या अभिवादन दौऱ्यानिमित्त राज्यातील विविध श्रद्धास्थानांना ते भेट देऊन अखेर अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे त्यांच्या अभिवादन दौऱ्याची सांगता होईल. यानिमित्ताने सिंदखेड राजा येथे आज मोठ्या प्रमाणात ओबीसींच शक्ती प्रदर्शनही होणार आहे.
सिंदखेड राजा येथून महाएल्गार यात्रेला सुरुवात
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी नुकतेच उपोषण करुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देण्याचे लेखी आश्वासन सरकारकडून पदरात पाडून घेतले होते. या आंदोलनावेळी लक्ष्मण हाके यांनी बोगस कुणबी दाखल्यांचा मुद्दाही उपस्थित केला होता. दरम्यान नुकताच त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला आहे.
तर ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज सिंदखेड राजा येथून महाएल्गार यात्रेला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त सिंदखेड राजा नगरीत मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. दुपारी साधारणता एक वाजता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे सिंदखेड राजा येथे पोहोचून जिजाऊंना अभिवादन करून त्यांच्या यात्रेला सुरुवात करणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज एकवटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनानेही तयारी केली आहे.
लक्ष्मण हाकेंच्या शिंदे सरकारकडे ‘या’ चार प्रमुख मागण्या
यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला निवेदन दिले आहे. यात चार मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…
1) सगे सोयरे अध्यादेश आणि 8 लाख हरकतीसंदर्भात सरकारने ॲक्शन टेकन रिपोर्ट किंवा जनतेसमोर या अहवालासंदर्भात आपलं म्हणणं मांडावं.
2) मागील आठ ते नऊ महिन्यात ज्या कुणबी नोंदी केल्या गेल्या. या संदर्भात शासनाने श्वेतपत्रिका जाहीर करावी.
3) इडब्ल्यूएस, कुणबी, एसईबीसी जशी पोस्ट निघेल त्याप्रमाणे या प्रमाणपत्रांचा उपयोग केला जातो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अनेक बोगस कुणबी सर्टिफिकेट काढून आयआरएस, आयपीएस पोस्ट काढलेले अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत. ते मी वेळप्रसंगी शासनाला देऊ शकतो. केंद्रीय किंवा राज्य स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा केंद्रीय आणि राज्य पातळीवर ऍडमिशनच्या वेळी हे तिन्ही सर्टिफिकेट आलटून पालटून वापरली जातात. दुबार तिबार सर्टिफिकेट घोटाळा होऊ नये म्हणून जातीचा दाखला आणि जात पडताळणी क्रमांक पॅनकार्ड आणि आधार कार्डला लिंक करावी म्हणजे खऱ्या मागासवर्गीयांवर अन्याय होणार नाही.
4) सगसोयरे या शब्दाचा उल्लेख हिंदू लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिश्चन लॉ, पारसी लॉ, भारतीय न्यायव्यवस्था किंवा न्याय निवाडे यामध्ये सगेसोयरे या शब्दाची व्याख्या आहे का? असेल तर शासनाच्या कायदे सल्लागार आणि आम्हाला सांगावे नाहीतर नवीन काहीतरी करण्याच्या फंदात शासनाने पडू नये, असे निवेदनात म्हटले आहे.











