लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर देशात एनडीएचं सरकार स्थापन होत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नसलं तरी भाजपाप्रणित एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसून महाराष्ट्रामध्ये भाजपचा दारूण पराभव झाला आहे. राज्यात भाजपला फक्त 9 तर महायुतीला एकूण 17 जागा मिळाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत.






महाराष्ट्रातील भाजपच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत कालच्या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मला संघटनेसाठी सरकारमधून मुक्त करा, अशी विनंती फडणवीस यांनी केली होती.
आज ते दिल्लीत जाणार असून नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच आज सकाळी अमित शाह यांनी स्वत: फडणवीस यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांच्या मात नेमकं काय चालंलय ते ऐकून, त्यांच्या भावना शाह यांनी जाणून घेतल्या. सविस्तर माहिती घेतली. आणि या मुद्यावर दिल्लीत आल्यावर, प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, असेही शाह यांनी फडणवीस यांना सांगितले.
उद्या भाजपची संसदीय पक्षाची बैठक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याने त्यावेळी शाह यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अमित शाह या हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील, त्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्यामागची कारणं जाणून घेतील, असे समजते. कारण राज्यातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला, नेत्यांना फडणवीस यांचे नेतृत्व हवं आहे. या बैठकीत काय होतं, पदावरून मुक्त करण्याची फडणवीसांची मागणी मान्य होते का, नेते त्यांना काय मार्गदर्श करतात, पुढे काय घडतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत भाजपला मोठा फटका
लोकसभा निवणुकीत भाजपला उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून आले होते. मात्र या निवडणुकीत हा आकडा फक्त 17 आहे. 2019 साली भाजपाचे 23 खासदार होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रा भाजपचे केवळ 9 खासदार निवडून आले. पक्षासाठी ही अतिशय धक्कादायक बाबा असून राज्याातील या खराब कामगिरीची जबाबादारी स्वीकारून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली होती.
“ पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी स्वीकारतो. मी मान्य करतो, मी स्वत: कमी पडलो. भाजपाला झटका बसला. महाराष्ट्रात जो पराभव झाला, त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायच आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करणार आहे की, मला सरकारमधून मोकळ करावं. जेणेकरुन, मला पूर्णवेळ पक्षासाठी काम करण्याची संधी मिळेल. ” असं काल देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता पुढे काय घडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.










