देशातील सहा टप्प्यांचं मतदान पूर्ण होईपर्यंत इंडिया आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय. तर दुसरीकडे भाजपचा 400 पारचा नारा पूर्ण होत नसल्याचं वेगवेगळ्या संस्थांच्या अंदाजात सांगितले जातंय. त्या सगळ्या पार्श्वभुमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मतदारसंघनिहाय विश्लेषण करण्यासाठी बैठक बोलावलीय, एवढंच नाही तर कोणत्या भागात किती मतदान झालं? मतदान कमी का झालं? नवीन मतदारांचा भाजपला फायदा होईल का? हिंदू मतं मिळवण्यात भाजपला यश मिळालंय का? याबरोबरच विधानसभानिहाय विश्लेषण करण्यात येणार आहे. यात ज्या आमदारांनी चांगली कामगिरी केली नसेल किंवा विरोधात काम केले असेल अशा आमदारांचं विधानसभेचं तिकीट धोक्यात येणार आहे.






राज्यातील लोकसभा निवडणूकीची धामधूम संपली, मतदान संपलं असलं तरी आता भाजप विधानसभेच्या तयारीला लागलाय, भाजपने यासाठी तातडीची बैठक बोलवलीय, त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर भाजप अक्शन मोडवर आल्याचं पाहायलं मिळतंय. याबद्दल बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, भाजपमध्ये ही पद्धत आहे. त्यामुळे विश्लेषण केलं नाही तर निर्णय घ्यायला अडचण येते.
भाजप अक्शन मोडवर आल्यानंतर लोकसभेला मदत न करणाऱ्या आमदारांची तक्रारही वरिष्टांकडे करण्यात आल्याच्या घटना अलीकडेच घडल्या. यात भिवंडीचे खासदार कपील पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी आपले काम केलं नसल्याचं म्हणत थेट फडणवीसांकडे तक्रार करून करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला.
लोकसभेत मोदी-शाहांचे लक्ष महाराष्ट्राकडे अधिक असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता विधानसभेतील निवडणुकीत केंद्रिय नेतृत्व राज्यात लक्ष ठेऊन असेल. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार की, भाजपातील केंद्रिय नेतृत्व काही वेगळा निर्णय घेणार? हे राज्यातील लोकसभेच्या निकालावर अवलंबून असेल.











