दंगलीनंतर कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर; इंटरनेट सेवा पुन्हा सुरु

0

कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीनंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळं बंद करण्यात आलेली कोल्हापुरातील इंटरनेट सेवा आता पूर्ववत झाली आहे.

आज सकाळी १० वाजता कोल्हापुरात इंटरनेट सुरु झाले. विविध टेलिकॉम कंपन्यांनी सकाळी १० वाजल्यापासून इंटरनेट सेवा सुरु करण्यास सुरुवात केली. कोल्हापुरातील तणावानंतर सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले होते.

त्यानंतर कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचा स्टेटस मोबाईलवर ठेवल्याच्या घटनेनंतर बुधवारी कोल्हापुरात उसळलेल्या दंगलीनंतर दुसर्‍या दिवशी गुरुवारी कोल्हापूर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले. दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. इंटरनेट कधी सुरु होणार? याची लोक वाट पाहात होते. गुरुवारी रात्री इंटरनेट सुरु होईल यासाठी काही लोक रात्री 12 वाजेपर्यंत जागे राहिले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे.