छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा सुटल्याचे म्हटले जात होते. पण, नवा ट्विस्ट आला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या हेमंत गोडसे यांची चिंता पुन्हा वाढली आहे. नाशिकमधून छगन भुजबळ हेच लढतील असे अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं. पण, उमेदवारी जाहीर करण्यात विलंब होत असल्याने आपण माघार घेत असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेमुळे हेमंत गोडसे आनंदी झाले. त्यांनी भुजबळांचे आभारही मानले. पण, आता या जागेवरून पेच निर्माण झाला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आग्रही
छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवरील दावा सोडला, अशी चर्चा सुरू झाली. पण, आम्ही या मतदारसंघावरील दावा सोडला नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या आधारावर करतेय दावा?
नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे हे दोन वेळा जिंकून आले आहेत. पण, पूर्वी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. आघाडीच्या काळात नाशिकची जागा राष्ट्रवादी लढवत आली आहे.
2004 ते 2009 या काळात राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे हे खासदार होते. त्यानंतर 2009 ते 2014 या काळात समीर भुजबळ हे या मतदारसंघातून विजयी झाले होते.
आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघातील ताकदीबद्दल सांगायचं झालं, तर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे आणि देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या अजित पवारांच्या पक्षात आहेत. त्याचबरोबर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. याच बळावर राष्ट्रवादी या जागेवर दावा करत आहे.
शिवसेना-भाजपमध्येही रस्सीखेच
2014 पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. हेमंत गोडसे हे विद्ममान खासदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी शिवसेना आग्रही आहे.
दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून या मतदारसंघासाठी प्रयत्न केले जात आहे. हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट नेत्यांनी घेतली होती.
गोडसेंचं टेन्शन कायम?
भुजबळांनी माघार घेतल्याने गोडसेंनी सुटकेचा निःश्वास टाकला होता, पण आनंद परांजपे यांनी दावा कायम असल्याचे सांगितल्याने हेमंत गोडसेंच्या जीवाला पुन्हा घोर लागल्याचे दिसत आहे.
हेमंत गोडसे हे सातत्याने एकनाथ शिंदे यांना भेटत असून, उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करताहेत. त्यांनी समर्थकांसह भेट घेऊन शिंदेंवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केलेला आहे. पण, आता हा पेच कसा सुटणार आणि अंतिम जागावाटपात कुणाला जागा मिळणार, याबद्दल जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे.