माढा लोकसभेसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे ठरत नव्हते. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील यांनी शुक्रवारी भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता ही निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.






माढ्याचा उमेदवारीचा तिढा सुटल्यानंतर भाजपचे खासदार आणि उमेदवार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी आमदार जयकुमार गोरे यांनी ‘तुम्ही सोबत आला तर ठीक, नाहीतर तुमच्याविना आम्ही निवडणूक लढू,असे म्हणत महायुती सोडणाऱ्यावर टीका केली.
माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य पाहावयास मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची भाजप नेत्यांबद्दल आणि भाजपच्या नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे महैतीमध्ये सर्व एकही आलबेल असल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे भाजपचे माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी टीका करीत काही झालं तरी महायुतीचे काम करावेच लागेल, असे निर्देश दिले आहेत.
सर्वांचे सहकार्य आवश्यक : गोरे
या लोकसभा निवडणुकीत काही गोष्टी फलटणमध्ये अडचणीच्या आहेत, तर काही गोष्टी माणमध्ये अडचणीच्या आहेत. त्याबद्दल अजितदादा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलत आहेत आणि देवेंद्र फडणवीस आमच्याशी बोलत आहेत, असं सांगत जयकुमार गोरे म्हणाले की, मुळात आम्हालाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे सहकार्य हवे आहे. कारण माढामध्ये आमचा उमेदवार आहे, आम्हीच त्यांना सहकार्य मागत आहोत, असे आमदार गोरे म्हणाले.
राष्ट्रवादीचे बहुतांशी नेते आणि कार्यकर्ते मदत करत आहेत. मात्र काही लोकांना काम करायचेच नाही किंवा त्यांच्याबद्दल आधीच तक्रारी होत्या, त्यांनीच अजितदादांकडे तक्रार केली असावी. ही निवडणूक सोबत आलेल्यांना घेऊन सन्मानाने लढायची आहे. मात्र, काही जणांना अडचण असेल तर निवडणूक त्यांच्याशिवायही लढायची आमची तयारी आहे. काही जणांना मार्गच काढायचा नसेल, तर ते अशी चर्चा करतात, त्यांची तशी वाटचाल सुरू असते, असेही गोरे यांनी स्पष्ट केले
येत्या काळात विरोध मावळलेला दिसेल
अकलूजमधील भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्यासोबत जाणार या संदर्भात मला फारशी कल्पना नाही. कोण कुठे जाणार आहे याची मला माहिती नाही. पण आपल्याला जो विरोध होता तो मावळलेला दिसेल, अशी आशाही खासदार रणजित निंबाळकर यांनी व्यक्त केली. राजकारणातील समस्या ही लाइटचे बटन दाबले आणि लगेच सुटते अशी नसते. त्यासाठी चर्चेतून तोडगे काढावे लागतात. येत्या काळात माढा संदर्भात वरिष्ठ नेत्यांसोबत आणखी एकत्रित बैठक होण्याची शक्यता आहे, असेही निंबाळकरांनी या वेळी सांगितले.












