मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार

0

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी या गेल्या तीन दिवसांत पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईत धडक दिली होती. मात्र, वाशीवरच त्यांचे आंदोलन थांबवत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होता. सोबतच पंधरा दिवसांत या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचं देखील आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावर देखील या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या याच उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती देखील खालावत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देखील रविवारी आंदोलनास्थळी दाखल झाले होते. मात्र, जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. जरांगेंच्या याच भूमिकेमुळे आता सरकारची अडचण वाढली आहे.

अधिक वाचा  मालेगाव स्फोट ‘मुक्तते’नंतर कर्नल पुरोहितांचे प्रमोशन; थेट ब्रिगेडियर पदी पदोन्नती; कारकिर्दीचा नवा टप्पा सुरू

आंतरवालीत पुन्हा गर्दी होऊ लागली….

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये चौथ्यांदा उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी त्यांच्या याच उपोषणास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळायची. दरम्यान, 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्याने आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा गर्दी होतांना पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहे. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती खालावल्याने ते कोणासोबत ही बोलत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकारकडून अजून कोणतेही हालचाली नाही…

सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मात्र, अजूनही सरकारकडून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी कुणीही आलं नसल्याचं किंवा संपर्क साधण्यात आले नसल्याचं जरांगे म्हणाले आहे. विशेष म्हणजे आज सरकारकडून जरांगे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच आज सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहे.

अधिक वाचा  ‘पल्टीमार’ ते जुळवाजुळवीचे तज्ज्ञ, महिला सशक्तीकरण इन्फ्रास्ट्रक्चर मॅनचा प्रवास; २० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा!