पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांना माहिती देताना त्यांनी लोकसभेची निवडणूक केंव्हा आणि किती टप्प्यात होणार ? हे सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच आचारसंहिता जाहीर केली जाऊ शकते, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बाजार समिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने काम करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, ‘‘लोकसभा आणि विधानसभेसाठी लवकरच आचारसंहिता लागू होईल. देशात सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याची आमच्यापर्यंत माहिती आहे. तीन ते चार महिने निवडणुकीत जाणार आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत’’, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष बनण्यासाठी करवीर आणि हातकणंगले तालुक्यात जास्तीत जास्त निधी देऊन सदस्य संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ‘‘जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळतात; पण राष्ट्रवादीमुळेच त्यांचा अध्यक्ष होतो. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात आपण कमी पडत आहोत.
या दोन्ही तालुक्यात जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे. यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावरच राहत आहे. आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आदिल फरास उपस्थित होते.