अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पक्षामध्ये फूट पडली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार आहेत. एवढच नाही तर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला आहे. तसंच पक्षाने आपली पक्षाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचंही निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं आहे.
एकीकडे महाराष्ट्रामध्ये झालेल्या या राजकीय भूकंपानंतर नागालँडमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. नागालँडमध्ये निवडून आलेल्या सर्व 7 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीचा एनडीपीपी-भाजपला पाठिंबा
नागालँडमध्ये वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला 37 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं होतं. एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12 जागांवर यश मिळालं. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपी-भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले. या 7 आमदारांनीच आता अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे.
पवारांनी सांगितलं होतं कारण
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत एकत्र का आलं? याचं कारण शरद पवारांनी तेव्हा सांगितलं होतं. ‘निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 विधानसभा सदस्य निवडून आले. निवडणुकीच्या काळात तिथल्या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजपसोबत आम्ही युती केलेली नाही,’ असं शरद पवार म्हणाले होते.
‘आमचं अंडरस्टॅण्टिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे. नागालँडचं एकंदरीत चित्र बघितल्यानंतर त्याठिकाणी एक प्रकारची स्थिरता येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे, पण भाजप म्हणून नाही,’ असं पवारांनी स्पष्ट केलं होतं.